हवामान विभागाचा २४ तासांचा अंदाज; मुंबई, ठाणे, रायगड ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षाच

0

महाराष्ट्रात कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. आज (सोमवारी) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.याशिवाय, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, गेल्या १२ तासांत मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. बहुतांश भागांत २० ते ४० मिमी, तर काही ठिकाणी ४० ते ७० मिमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे हा पाऊस अवघ्या एका तासाच्या कालावधीत झाला. त्यामुळे सायंकाळच्या वेळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, अंधारात रस्त्यांवरील पाणी साचलेल्या ठिकाणांपासून सावध राहावे, असे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.मंगळवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाटमाथा परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अधिक वाचा  दोन अनाथ विद्यार्थिनींना कोंडलं, Whatsapp Status अन्… रात्रभर पुण्यात राडा; काँग्रेस-भाजपामध्ये नेमकं घडलं काय? A To Z माहिती

दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील अनेक भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाअभावी खरीप पिकांवर ताण वाढत असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या समुद्रसपाटीपासून सुमारे ०.९ किमी उंचीपर्यंत सक्रिय असून तो श्रीगंगानगर, रोहतक, हरदोई, वाराणसी, डाल्टनगंज, पुरुलिया आणि दीघा मार्गे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.

याशिवाय, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागर आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. ही प्रणाली दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण गुजरातमार्गे ईशान्य अरबी समुद्रापर्यंत पसरली असून, त्यामुळे कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवरची टीका जिव्हारी स यादी निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी बिडकर यांचेही खुले पत्र