कोकण, घाटमाथा आणि राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत. मात्र, (८ जुलै) पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.







दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही वेळापासून मुसळधार पाऊस सुरू असून पुढील दोन ते तीन तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उपनगरे, नवी मुंबई, पालघरचा काही भाग आणि उत्तर रायगड जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसासह काही ठिकाणी अति जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सखल भागांत पाणी साचणे, वाहतूक कोंडी, कच्च्या घरांना धोका आणि दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, हंगामी कमी दाबाचा पट्टा नैर्ऋत्य राजस्थानपासून बांगलादेशपर्यंत विस्तारला असून दक्षिण गुजरात आणि केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आग्नेय अरबी समुद्रापासून गुजरातमार्गे मध्य भारत आणि बांगलादेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) जमिनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. मंगळवारी ही प्रणाली पूर्व मध्य प्रदेशावर होती. आज ती उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकत निवळण्याची शक्यता असल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. घाटमाथ्यावरील दावडी येथे राज्यातील सर्वाधिक ६८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोणावळा, ताम्हिणी आणि भिरा येथे ५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. राज्याच्या इतर भागांत हलक्या ते जोरदार सरी पडल्या. तापमानाच्या नोंदीत नागपूर, वाशीम आणि जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले, तर महाबळेश्वर येथे नीचांकी १८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.













