पुणे: महावितरणकडून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर योजनेतील सक्ती, सेवा त्रुटी, ग्राहकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष आणि अपारदर्शक अंमलबजावणीच्या निषेधार्थ आज राजमुद्रा महावितरण कार्यालय, धनकवडी येथे पतित पावन संघटना, पुणे शहर यांच्या नेतृत्वाखाली वीज ग्राहकांनी लाक्षणिक उपोषण करून तीव्र आंदोलन केले.







या आंदोलनात सहभागी नागरिकांनी बिल भरल्यानंतरही अनेक तास किंवा काही प्रकरणांमध्ये अधिक काळ वीजपुरवठा सुरू होण्यास विलंब झाल्याच्या तक्रारी मांडल्या. आंदोलनकर्त्यांनी या घटनांची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे विजय क्षीरसागर म्हणाले, “आमचा विरोध स्मार्ट तंत्रज्ञानाला नाही; आमचा विरोध ग्राहकांच्या संमतीशिवाय सक्तीने होणाऱ्या अंमलबजावणीला, अपारदर्शक कारभाराला आणि वीज ग्राहकांच्या छळाला आहे. ग्राहक हा महसूल देणारा आहे; तो प्रयोगशाळेतील प्रयोग नाही.”
संघटनेने महावितरण आणि राज्य शासनासमोर पुढील प्रश्न उपस्थित केले
– बिल भरल्यानंतरही 30 ते 40 तास वीजपुरवठा सुरू होण्यास विलंब का होतो?
– चुकीचे बिल आल्यास ग्राहकाला त्वरित न्याय आणि नुकसानभरपाईची व्यवस्था का नाही?
– स्मार्ट मीटरची अचूकता, डेटा सुरक्षा आणि रिमोट कनेक्ट–डिस्कनेक्ट प्रणालीबाबतचे तांत्रिक अहवाल सार्वजनिक का केले जात नाहीत?
– वितरण व्यवस्था सक्षम करण्याआधी स्मार्ट मीटरची घाई का केली जात आहे?
– ग्राहकांच्या हरकती व सूचना विचारात घेण्यासाठी सार्वजनिक संवाद का आयोजित केला जात नाही?
आमच्या मुख्य मागण्या
– स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी.
– ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय मीटर बदलू नयेत.
– स्वतंत्र तांत्रिक चौकशी समिती नेमावी.
– चुकीच्या बिलांबाबत आणि सेवा त्रुटींबाबत नुकसानभरपाईची स्पष्ट यंत्रणा लागू करावी.
– राज्यभर जनसुनावणी घेऊन ग्राहकांचे म्हणणे ऐकावे.
– महावितरणने प्रथम वितरण व्यवस्था सक्षम करून अखंड व दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करावा.
संघटनेने स्पष्ट इशारा दिला की, जर ग्राहकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर राज्यव्यापी लोकशाही मार्गाने आंदोलन, जनजागृती मोहीम, निवेदने आणि उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब करण्यात येईल.
मुख्यमंत्री महोदयांना आवाहन
महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन स्मार्ट मीटर योजनेची अंमलबजावणी, ग्राहकांच्या तक्रारी आणि सेवा गुणवत्तेचा सर्वंकष आढावा घ्यावा. नागरिकांचा विश्वास जिंकल्याशिवाय कोणतीही योजना सक्तीने राबवू नये.
यावेळी संघटनेचे विजय क्षीरसागर, राकेश जावडेकर,अग्रवाल सर,मोहन बोराडे, संदीप कांबळे, योगेश पवार, तुषार सुर्वे,यादव पुजारी,शंकर मुसमाडे पाटील, संतोष सोनवणे उपस्थित होते.













