हरिश्चंद्रगडाच्या पर्वत रांगांत मान्सून सक्रिय होऊ लागला आहे. मुळा खोऱ्यातील आंबित धरण ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे मुळा नदी प्रवाही झाली आहे. यानंतर आर्द्रा नक्षत्रात दोन-तीन दिवस पावसाच्या सरी कोसळल्यानंतर पावसाने पुन्हा उघडीप दिली आणि बळीराजा चिंतातूर झाला. असे असताना हरिश्चंद्रगड परिसरात शनिवारी सायंकाळी अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी मुळा नदीवरील १९३ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबित धरण रविवारी पहाटे पाच वाजता पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे भात रोपांना संजीवनी मिळाली आहे.






पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात रविवारी पावसाने मुळसधार वर्षाव केला. कोल्हापूर, सोलापूर, सातारा शहरात सुमारे तासभर झालेल्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सांगली जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाला. गेले दाेन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रत्नागिरीत पुन्हा हजेरी लावली.
जांभळीच्या ओढ्यांना पूर
पाथर्डी (जि. अहिल्यानगर) : तालुक्यातील जांभळी शिवारामध्ये रविवारी दुपारी दीड तास जोरदार पाऊस झाला. अचानक विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर आला. पावसामुळे तलाव ५० टक्के क्षमतेने भरला.
वीज कोसळून तरुण ठार
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाल (ता. रावेर) येथील गारबर्डी धरण परिसरात रविवारी वीज कोसळून गणेश बल्लू भिलाला (३५) या आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाऊस सुरू असताना गणेश हा घराजवळ काम करत असताना ही दुर्घटना घडली.
वर्ध्यात १० वानरांचा मृत्यू
समुद्रपूर (वर्धा) : वीज कोसळून दहा वानरांचा मृत्यू झाला. ही घटना गोविंदपूर आजदा परिसरात रविवारी सायंकाळी घडली. पाऊस सुरू झाल्याने वानरांचा एक कळप झाडावर बसला होता. मात्र, याच झाडावर वीज कोसळल्यामु त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विश्रांतीनंतर पुनरागमन
नाशिक : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले. दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागातील पाणी गोदाघाटाच्या दिशेने वाहू लागले. घाट परिसरातील नाल्यांमधून पाणी उफाळून आले.













