पुणे (प्रतिनिधी) : वैयक्तिक दुःखावर कर्तव्याला प्राधान्य देत केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी वडिलांच्या दशक्रिया विधीनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा जनसेवेत सक्रिय होत पर्वती विधानसभा मतदारसंघात जनता दरबाराचे आयोजन केले. या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि विकासकामांबाबतच्या मागण्या त्यांनी थेट जाणून घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.






पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या उद्देशाने खासदार मुरलीधर मोहोळ दर महिन्याला एका विधानसभा मतदारसंघात जनता दरबार आयोजित करतात. या उपक्रमाद्वारे नागरिकांना थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळत असून विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून अनेक प्रश्नांवर त्वरित कार्यवाही केली जात आहे.
रविवारी पर्वती विधानसभा मतदारसंघात पार पडलेला हा १७ वा जनता दरबार असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, नागरी सुविधा, महसूल, वीज, आरोग्य तसेच इतर शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्न मांडले. प्रत्येक तक्रारीची सविस्तर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या.
यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “जनतेशी सातत्याने संवाद ठेवणे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. नागरिकांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद असून पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम कटिबद्ध आहे.”
जनता दरबाराला राज्य मंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, भाजपा नेते बाबाशेठ मिसाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.













