नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय दाखले आणि तिच्या शरीरावरील जखमांचे सविस्तर विश्लेषण करून त्या ३९ मिनिटांत झालेल्या अत्याचारांचे पुरावे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात मांडले. ‘सीसीटीव्ही फुटेज, ‘डीएनए’चा अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा खोटेपणा उघडा पाडताना संपूर्ण दोषारोप सिद्ध करून त्याला कठोर शिक्षा व्हावी,’ अशी मागणी ॲड. मिसर यांनी न्यायालयाकडे केली. या प्रकरणाचा येत्या २५ जूनला निकाल लागण्याची शक्यता आहे.






चिमुकलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याने पीडितेला दुपारी तीन वाजून १२ मिनिटांनी घटनास्थळाकडे नेले. त्यानंतर, दुपारी तीन वाजून ५१ मिनिटांनी तो त्याच घटनास्थळावरून एकटाच परत येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसते. या तांत्रिक पुराव्यावरून पीडिता ही तब्बल ३९ मिनिटे आरोपीच्या ताब्यात होती, हे सिद्ध होते. यादरम्यान, त्याने पीडितेवर अत्यंत पाशवी अत्याचार व अनैसर्गिक संभोग केला. त्यानंतर, तिची निर्घृण हत्या करून मृतदेह लपवून ठेवला, अशी माहिती विशेष सरकारी वकील मिसर यांनी न्यायालयाला दिली.
नसरापूर येथील तीन वर्षीय मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ॲड. मिसर आणि त्यांचे सहकारी ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे न्यायालयासमोर शनिवारी झालेल्या अंतिम युक्तिवादा दरम्यान ठेवले. पीडितेच्या मृत्यूनंतरही आरोपीने निर्लज्जपणे तिच्या मृतदेहावर अत्याचार केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सुनावणीदरम्यान, सरकार पक्षातर्फे नसरापूर प्रकरणातील आरोपीवर लावलेल्या प्रत्येक कायदेशीर कलमाची व्याख्या स्पष्ट करून तपास यंत्रणेने गोळा केलेल्या सहा सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन गुन्ह्याचा घटनाक्रम मांडला. पीडितेचा शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय दाखले आणि तिच्या शरीरावरील जखमांचे सविस्तर विश्लेषण करून त्या ३९ मिनिटांत झालेल्या अत्याचारांचे पुरावे या वेळी न्यायालयापुढे सादर करण्यात आले आहेत.
आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध
अहवाल आणि ‘डीएनए’ प्रोफाइलिंगच्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग निर्विवादपणे सिद्ध करण्यात आला. घटनेनंतर आरोपीच्या वर्तनातील संशयास्पद बाबी आणि त्याला यापूर्वीच्या खटल्यांमुळे असलेल्या कायद्याच्या ज्ञानाचा वापर करून त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कसा केला, याकडे विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
हे होते महत्त्वाचे पुरावे
-आरोपीने घटनास्थळाची रेकी केली
-मुख्य साक्षीदार आणि बालसाक्षीदारांचे जबाब भक्कम
-घटनास्थळ पंचनामे, आरोपीची ओळख परेड यातून गुन्ह्याची साखळी सिद्ध
-पुराव्यांमध्ये छेडछाड झालेली नसल्याचेही स्पष्ट













