महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना मागील काही तासांपासून प्रचंड वेग आला आहे. मंगळवारी सायंकाळी राज्यात ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली होती. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याची माहिती समोर आली होते.हे सर्व खासदार शिंदे गटात विलीन होण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. सर्वांना नांदेड, पुणे, मुंबई, शिर्डी विमानतळावरून खासगी विमानाने रातोरात दिल्लीत नेण्यात आलं होतं. या सर्वांनी संसदेत वेगळा गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याच्या बातम्याही समोर आल्या.






पण आता ऑपरेशन टायगरमध्ये मोठा ट्विस्ट आल्याची माहिती आहे. ऑपरेशन टायगर फेल झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वत: यावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार पक्षातून फुटल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याच्या बातम्या खोट्या आहेत. काही खासदारांनी अशाप्रकारे प्रयत्न केला. मात्र ६ जण फुटले नाहीत. शिवाय शिवसेना यूबीटीचे खासदार शिंदेसेनेत सामील झाल्याची कोणतीही माहिती लोकसभा सचिवालयाकडून मिळालेली नाही, आज होणाऱ्या शिवसेना यूबीटीच्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेतले जातील, असंही राऊत यांनी सांगितलं.
खरं तर, ठाकरे गट फुटला असता किंवा ठाकरे गटाच्या खासदारांनी संसदेत वेगळा गट स्थापन केला असता तर लोकसभा सचिवालयाकडून याबाबतची माहिती मूळ पक्ष अर्थात शिवसेना ठाकरे गटाला दिली असती, मात्र अद्याप ठाकरे गटाला तशी अधिकृत माहिती मिळाली नाही. त्यामुळे राज्यातील ऑपरेशन टायगर फेल झाल्याचं मानलं जात आहे. संजय राऊत यांच्याकडूनही यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
ठाकरेंचे सहा खासदार दिल्लीला गेल्याची माहिती कळताच ठाकरे गटाकडून कायदेशीर पावलं उचलली होती. ठाकरे गटाकडून खासदारांसाठी व्हीप जारी केला होता. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून अशाप्रकारे कुणालाही मान्यता देऊ नये, अशी विनंती केली होती. तरीही फुटीर खासदारांचा वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. मात्र ऐनवेळी गेम फिरला आणि सहापैकी दोन खासदारांनी सह्या करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. यामुळेच ऑपरेशन टायगर फेल झालं असल्याची चर्चा आहे.













