राज्यातील राजकारण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापले असतानाच काँग्रेससाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे तब्बल २३ नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत घोडेबाजार सुरू असल्याचा दावा केला आहे. आमचे जवळपास २३ नगरसेवक संपर्काबाहेर गेले आहेत. त्यांना प्रत्येकी पाच-पाच लाख रुपये देऊन अज्ञातस्थळी नेण्यात आलं, असा गंभीर आरोप त्यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप केला आहे.






तसेच, पैशाच्या जोरावर आमचे लोक विकत घेतले जात आहेत. आता आम्ही संबंधित नगरसेवकांविरोधात व्हीप जारी करून त्यांच्या घरांवर नोटीस चिटकवणार आहोत. त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली जाईल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. दरम्यान, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या भागातील जवळपास ७० नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. काँग्रेसकडून सुरुवातीला हे वृत्त फेटाळण्यात आले होते. मात्र आता विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच नगरसेवक संपर्काबाहेर गेल्याची कबुली दिल्याने चर्चांना अधिक उधाण आले आहे.
एका मतासाठी १० लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याची चर्चा देखील सुरू असून, या घडामोडींमुळे काँग्रेससमोर मोठं राजकीय संकट उभं राहिलं आहे. भाजपवर निशाणा साधताना वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूरमध्ये घोडेबाजार जोरात सुरू आहे. खरंतर याची गरज नव्हती. पण आता आमदार ठेकेदार बनल्यामुळे पैशाची मस्ती वाढली आहे. श्रमाशिवाय लोकप्रतिनिधी ठेकेदार होत असल्याने राजकारणातील नीतीमत्ता संपत चालली आहे.













