या ज्येष्ठ नेत्यांनी गाठलं मंत्रालय, पश्चिम महाराष्ट्राच गणित बदललं? पुन्हा आमदारकी मिळणार? की जिल्ह्यात सत्ता संघर्ष सुरूच राहणार

0

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार याविषयी मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे बुधवारी(ता.22) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले होते. मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतलेल्या भेटीमागं रणजितसिंह मोहिते यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची आमदारकी मिळावी हे कारण असल्याचं बोललं जात आहे. याचवेळी भाजपमध्ये विधान परिषदेच्या सहा जागांसाठी इच्छुकांनी आपआपल्या गॉडफादरकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

माढा लोकसभा निवडणुकीदरम्यान, ताणले गेलेल्या संबंधांमुळे यावेळी भाजप रणजितसिंह मोहिते पाटलांचा पत्ता कट करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता याचदरम्यान,एक मोठी राजकीय अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जवळ गेल्याचं दिसून आलं होतं. पण आता विधान परिषदेचं वार वाहू लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या राजकारणाची कूस बदलल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे.

अधिक वाचा  अन्नपदार्थ आणि औषधातील भेसळ? तक्रारासाठी टोल फ्री नंबर- एका कॉलवर तक्रार करा मुंढे करतील कारवाई

याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी मोठा दबदबा असलेले विजयसिंह मोहिते पाटील हे बुधवारी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी त्यांच्यासोबत चिरंजीव व माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील देखील होते. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विधान परिषदेची टर्म येत्या 13 मे रोजी संपणार आहे. त्याचधर्तीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी विजयसिंह मोहिते पाटील हे मंत्रालयात दाखल झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्या पाया पडल्याचंही दिसून आलं. एकीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपच्या नेहमीच्या धक्कातंत्राची रणनीती पाहता रणजितसिंह मोहिते पाटील आणि दादाराव केचे यांच्या नावावर मुख्यमंत्री फडणवीसांनी फुली मारल्याची चर्चा रंगली होती. त्यातही रणजितसिंह मोहिते पाटलांच्या उमेदवारीला भाजपनमधूनच मोठा विरोध दर्शवला जात आहे. यात माढा लोकसभा निवडणुकीचा संदर्भही आहे.

अधिक वाचा  मुसळधार पावसाचा २१ जिल्ह्यांना अलर्ट; ताशी ७० च्या स्पीडने येतंय तुफान, येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस

माढा लोकसभा निवडणुकीत भाजपनं पूर्ण ताकद लावूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकर यांना पराभवाचा धक्का दिला होता. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यानंतर भाजप विशेषत: फडणवीसांनी मोहिते पाटलांच्या विरोधातलं राजकारण अधिक धारदार करत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांना मोठी रसद पुरवल्याचंही दिसून येत आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं आपला प्लॅन बदलण्याचे संकेत दिले आहेत. एकूण 6 जागांपैकी किमान 2 जागांवर महिलांना संधी दिली शक्यता आहे. यामुळे पक्षातील इच्छुकांची धडधड वाढली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात बंडाळी टाळण्यासाठी अनेक इच्छुकांना विधानपरिषदेवर संधी देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. मात्र, आता प्रत्यक्षात मर्यादित जागा उपलब्ध असल्यानं 1 किंवा 2 जणांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  मान्सून पुन्हा लांबणीवर…महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

तर भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी कामगिरी केलेले पण अद्याप आमदार न झालेल्या काही नेत्यांनाही संधी देण्याच्या विचारात असल्याचं समोर येत आहे. त्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांतील काही जिल्ह्यांमधून प्रबळ दावेदार समोर आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यावर चर्चा सुरु एकमत झाल्याचीही कुजबुज सुरू आहे. त्यात काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे, तर माधवी नाईक, अर्चना पाटील चाकुरकर, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते आणि संजयकाका पाटील, संजय केनेकर, विवेक कोल्हे अशी काही प्रमुख नावं सध्या चर्चेत आहेत.