संपूर्ण देशामध्ये पोलीस यंत्रणेत असविधानिक कार्य करणाऱ्या पोलीस यंत्रणेची प्रकरणे दिवसेंदिवस वाढीस जात असताना तामिळनाडूतील बहुचर्चित साथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणाच्या निकालामुळे एक नवा अध्याय लिहिला गेला असून महाराष्ट्रातील बहुचर्चित सोमनाथ सूर्यवंशी खटल्यालाही या निकालाचा फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तामिळनाडूतील बहुचर्चित साथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात ५ वर्षांनंतर ९ पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खाकी वर्दीतील एका कर्मचाऱ्याने संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध दिलेला हा लढा न्यायाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे.






एका वडील आणि मुलाचा पोलीस छळात झालेल्या मृत्यूच्या या घटनेने त्याकाळी संपूर्ण देश हादरला होता. मात्र, या प्रकरणाला पाच वर्ष अंतापर्यंत नेण्यात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाम उभे राहण्यात एका कनिष्ठ महिला पोलीस कर्मचाऱ्याची, हेड कॉन्स्टेबल रेवती यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
साथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरण काय होते?
२०२० मध्ये कोविड निर्बंधांचे उल्लंघन करून मोबाईलचे दुकान उशिरापर्यंत उघडे ठेवल्याच्या आरोपावरून पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीत असताना त्यांच्यावर अमानवीय अत्याचार करण्यात आले, ज्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता.
रेवती ‘खाकी’तील सत्याचा आवाज
ज्या रात्री ही घटना घडली, त्या रात्री रेवती साथानकुलम पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होत्या. आपल्याच सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला अमानवीय छळ त्यांनी जवळून पाहिला होता. जेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट एम.एस. भारतीदासन हे पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा रेवती यांनी अत्यंत धाडसाने समोर येत सत्य सांगण्याचा निर्णय घेतला.
स्त्री-शक्तीला सक्षम करू या!
मॅजिस्ट्रेटसमोर त्या म्हणाल्या होत्या, “सर, मी तुम्हाला प्रत्येक तपशील सांगेन, ते सत्य सांगेन जे लपवले जात आहे. पण मला २ लहान मुली आहेत. तुम्ही माझ्या मुलांच्या सुरक्षिततेची आणि माझ्या नोकरीची हमी देऊ शकता का?”
न्यायालयासमोर अंगावर शहारे आणणारी साक्ष
रेवती यांनी मॅजिस्ट्रेटसमोर त्या रात्रीच्या क्रूरतेचा मिनिट-टू-मिनिट घटनाक्रम मांडला. त्यांनी सांगितले की, आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांनी बाप-लेकावर लाठ्यांनी आणि हाताला लागेल त्या वस्तूने हल्ला केला. एवढेच नाही तर मद्यपान करून त्यांच्या खासगी भागावर बुटांनी तुडवले.
मारहाणीत दोघेही रक्तबंबाळ झाले होते. त्यानंतर इन्स्पेक्टरने त्याच जखमी अवस्थेत त्यांच्याकडून जमिनीवरील रक्ताचे डाग पुसून घेतले. रेवती यांनी जखमी जयराज यांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला होता, पण इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ती फेकून दिली. जेव्हा छळ असह्य झाला, तेव्हा त्या तिथून बाहेर निघून गेल्या.
दडपण आणि धमक्यांना झुगारले
रेवती या एक कनिष्ठ कर्मचारी होत्या, तर आरोपी अधिकारी शक्तिशाली होते. चौकशीदरम्यान पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने पोलीस जमले होते, जे रेवती यांना धमकावण्याचा आणि कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. या दबावामुळे त्या सुरुवातीला जबानीवर सही करण्यास घाबरत होत्या. मात्र, मॅजिस्ट्रेटनी त्यांना पूर्ण संरक्षणाचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी स्वाक्षरी केली.
न्यायाचा विजय
रेवती यांच्या साक्षीने सीसीटीव्ही फुटेजमधील पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यास आणि त्यांची गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थिती सिद्ध करण्यास मोठी मदत केली. त्यांच्या या धाडसी पाऊलामुळेच आज नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा होऊ शकली. मद्रास उच्च न्यायालयानेही त्यांच्या सुरक्षेची दखल घेत त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश दिले होते.










