पुण्याची सांस्कृतिक राजधानी अन् संपूर्ण पुणे शहरात झपाट्याने पुनर्विकसित होणारा भाग म्हणून ‘कोथरूड’चा नाम उल्लेख केला जात असला तरी सुद्धा पुणे महापालिका प्रशासकीय स्तरावर विकास आराखडा तयार करताना कोथरूड जुनी हद्द व नवीन हद्द यांचा विकास आराखडा करताना आखण्यात आलेले विकास आराखड्यातील रस्ते भिन्न प्रकारचे बनविण्यात आल्याने भविष्यातील कोथरूडला ‘वाहतूक कोंडी’चा अभिशाप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोथरूड परिसरात सध्या पुनर्विकासाची कामे करताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत असून बहुमजली इमारतीमध्ये लोक वस्ती वाढल्यानंतर ही समस्या आणखी गंभीर होणार आहे.






पुणे महापालिकेत 1985 मध्ये समाविष्ट झालेल्या (कोथरूड जुनी हद्द)भागाचा विकास आराखडा तयार करताना संभाव्य बाह्य वळण मार्ग लगत जाणाऱ्या रस्त्यांची आखणी करण्यात आली होती. मुख्य कोथरूड गावातून भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या स्मारकापासून बाह्य वळण महामार्गापर्यंत 36 मीटर रुंदीचा रस्ता पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने आखण्यात आला आहे. त्यानंतर 1995 मध्ये उर्वरित कोथरूड व बावधन भागाचा पुणे महापालिकेमध्ये समावेश झाला आणि या भागातील पूर्वी नगर विकास विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेल्या डावी भुसारी कॉलनी भुसारी कॉलनी व महात्मा सोसायटी या मोठ्या ले- आऊट ची जशीच्या तशी मांडणी पुणे महापालिकेच्या विकासाराखड्यामध्ये करण्यात आली आहे. या विकास आराखड्यात मौजे कोथरूड नवीन हद्द विकास आराखड्यात स.नं. ७६ ते ७९ मधील दर्शविलेला (शांतीबन सोसायटी ते बाह्यवळण महामार्ग) १५ मीटर रस्ता ३० मीटर करणे ही काळाची गरज बनली आहे. कोथरूड परिसरातील स.नं. ७६ ते ७९ (शांतीबन सोसायटी ते बाह्यवळण महामार्ग) या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत असून नवीन गृहनिर्माण प्रकल्प, सोसायट्या व व्यावसायिक आस्थापना मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
स.नं. ७९ सूरजनगर येथून स.नं. ७६ मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ कडे जाणारा हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी तसेच मुळशीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग बनला आहे. पुणे महापालिकेच्या 1985 च्या (जुनी हद्द) विकास आराखडा करताना भविष्यात या मार्गावर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्वे पुतळा ते मुंबई बाह्यवळण मार्ग DP रोड 36 मीटर करण्यात आला होता; परंतु नवीन समाविष्ट गावांच्या विकासा आराखड्यामध्ये हाच रस्ता १५ मीटर रुंदीचा दर्शविण्यात आला असून वाढती लोकवस्ती लक्षात घेता या भागात वाहतूक कोंडी अटळ बनत आहे. परिणामी वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता तसेच नागरिकांना होणारा त्रास वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या विकास आराखड्यातील रस्त्यालगतच एकलव्य कॉलेज, सिटी इंटरनॅशनल स्कूल, जेपी नाईक संस्था भरती विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय मोहिते विद्यालय अशा विविध शैक्षणिक संस्था असून भविष्यातील शहर विकास, वाढती लोकसंख्या आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करता सदर रस्ता ३० मीटर रुंदीचा करणे आवश्यक आहे. या रस्त्याची रुंदी वाढविल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, आपत्कालीन सेवा (रुग्णवाहिका, अग्निशमन दल इ.), पी एम पी एल ची सेवा यांना मार्ग उपलब्ध होईल तसेच परिसराचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होईल असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. सध्या लोकनियुक्त प्रतिनिधीची व्यवस्था पुणे महापालिकेमध्ये निर्माण झाल्याने यावर स्थानिक नगरसेवकांनी पातळीने लक्ष घालून मार्ग काढावा अशी मागणी जोर धरत आहे.












