दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर उफाळून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला दिल्लीतील उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी यांच्या गाठीभेटीमुळे आता खो बसला आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीतील गाठीभेती सुरू झाल्या आणि बहूप्रतिक्षित असलेली आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषदेची लांबली आहे. राष्ट्रवादी विलनीकरणास सध्या कोणतेही अनुकूल वातावरण नसल्याची जाणीव स्पष्टपणे होत आहे. काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी केंद्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी विलीनीकरणाचा निर्णय आता भाजपच्या हातात गेला आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अद्यापही याबाबत भाष्य ना करता या चर्चेवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.






उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आज दिल्लीत भेट घेतल्यानंतर या शक्यता आता धूसर झाल्या आहेत. महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधीपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक जाण्याने या चर्चांना आणखीनच जोर आला होता.
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र यावे, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या विलीनीकरणाबाबत अद्याप ठोस प्रतिसाद शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला नसल्याने या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची शक्यता आता धूसर झाली आहे.
सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची दिल्लीत भेट घेतली. दिल्लीतील दोन मोठ्या नेत्यांच्या सल्ल्याशिवाय ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ कोणताच निर्णय घेणार नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.











