पुणे तिथे काय उणे! पुणे हे बुद्धिवंतांचे शहर! पुण्यात शिकला जगात टिकला! अशा अनेक अभिमानाच्या बिरुदावली पुणेकरांसाठी वापरल्या जाण्याचं कारण म्हणजे पुण्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वत्र अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपची चर्चा सुरू असताना रात्री मोठ्या साहेबांची बिन आवाजाची काठी चालली आणि संपूर्ण पुणे शहराचे चित्रच पालटले. एकीकडे शरद पवार यांचा निष्ठावान शिलेदार ‘प्रशांत’ (2019 च्या उद्दिष्टाच्या उंबरठ्यावर) शांत होताच काँग्रेस पक्षाच्या वतीनेही समजूतीची भूमिका घेतल्याने पुणे शहरात महाविकास आघाडीचे मूर्त स्वरूप मतदारांपुढे येण्याच्या वाटचालीला शुभारंभ झाला. काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याच्या जागा शिवसेना (उबाठा) या कोट्यातून देण्यास मान्यता दिल्याने देवाभाऊंचे मनसुबे आणि अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम साध्य झाला आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घड्याळ की तुतारी या चिन्हांवर तोडगा न निघाल्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य युती जवळपास फिस्कटल्यातच जमा झाली आहे.






पुणे आणि पिंपरी चिंचवडसह इतरही काही महापालिकांच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अजित पवार हे घड्याळ चिन्हासाठी आग्रही होते. मात्र, शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र (विजयानंतर भाजपला पाठिंबा देण्याच्या भीतीने) तुतारी चिन्हावर ठाम होते. हा मतभेद सुरू असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भव्य दिव्य प्रवेश सुरू करून शरद पवारांच्या पक्षाला फक्तं 35 जागांचा प्रस्ताव देण्यात आला.यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर येत आहे. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तत्काळ आपला प्लॅन बदलला असून मविआ(शिवसेनेच्या कोट्यातून मनसे)च्या बैठकीत उपस्थिती लावत चर्चाही सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सगळ्या वेगवान घडामोडींनंतर पुण्याच्या महापालिका निवडणुकीचा रंगच बदलला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री पालकमंत्री पुणे जिल्हा यांचे छुपे मनसुबे शरद पवार यांच्या बिन आवाजाच्या काठीने गारद झाल्याची चर्चा सुरू झाली असून 2 दिवसातच संपूर्ण पुणे शहरात नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चिन्हाबाबत एकमत न झाल्यानं मात्र ही युती फिस्कटल्याची माहिती आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. अनेक मुद्द्यावर उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही दोघेजणही निष्कर्षपर्यंत पोहचलो आहोत. त्यामुळे आता येत्या काळात जिथे शक्य असेल त्या ठिकणी एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पत्रकरांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आता शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय निश्चित होण्याची शक्यता आहे.













