बिहार निकालाने भाजपच्या आत्मविश्वासात वाढ; 40 स्टार प्रचारकांची ‘स्थानिक’साठी नावे जाहीर

0

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. त्यातच आता भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.नुकतंच भाजपने स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांची मर्यादा २० वरून ४० केल्याने भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणरा आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेक ठिकाणी भाजपने मित्रपक्षांची युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच लागलेल्या बिहार निवडणुकीच्या निकालाने पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच जोशात भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाड्यात उतरणार आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

स्टार प्रचारकांच्या यादीत यांचा समावेश?

भाजपने जाहीर केलेल्या यादीत केंद्रीय आणि राज्य पातळीवरील अनुभवी नेत्यांसह आक्रमक चेहऱ्यांना स्थान दिले आहे. याचे प्रमुख नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे असणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे या निवडणुकांच्या प्रचाराची मुख्य धुरा सांभाळणार आहेत.

तसेच नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, तसेच राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश हे केंद्रीय नेते निवडणुकीच्या प्रचारात दिसणार आहेत. तसेच चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, गणेश नाईक, आणि जयकुमार रावल हे राजकीय नेतेही प्रचार करणार आहेत. यासोबतच नारायण राणे, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, आशिष शेलार, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, शिवेंद्रराजे भोसले आणि मेघना बोर्डीकर हे नेतेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार करताना दिसत आहे.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

राज्यभर प्रचारासाठी ४० नेत्यांची फौज

दरम्यान पूर्वी स्टार प्रचारकांची संख्या केवळ २० इतकी मर्यादित होती. मात्र, राजकीय पक्षांच्या मागणीनुसार निवडणूक आयोगाने ही संख्या दुप्पट म्हणजेच ४० केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर या ४० नेत्यांची फौज राज्यभर प्रचाराचा धुरळा उडवणार आहे. विशेष म्हणजे, अल्पसंख्याक समाजातील इद्रिस मुलतानी आणि माजी खासदार अमर साबळे यांच्यावरही प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये भाजपचे हे मिशन इलेक्शन किती यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.