निवडणूक घोषणा या आठवड्यातच; यासाठी मध्य प्रदेश सरकारशी करारही झाला मुंबई 15 ते 20 जाने दरम्यान

0

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तसेच महापालिकांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६च्या आत घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. प्रभाग रचना, इतर मागासवर्गांचे आरक्षण यांसारख्या विविध मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती आदींच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आली. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल.

अधिक वाचा  ओबीसी आरक्षणावर गदा, राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश; हा नियम सर्व ‘स्थानिक’ला लागू होणार का?

राज्यातील मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६च्या आत घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस आधी पार पाडल्या जातील, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

अधिक वाचा  मॉन्सूनच्या वाऱ्याचा वेग वाढला! महाराष्ट्रात दक्षिण कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर चार दिवस मुसळधार

मतदान यंत्रासाठी मध्य प्रदेश सरकारशी करार

राज्यात प्रथमच मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम) तुटवडा भासू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मशिन पुरवठ्यासाठी मध्य प्रदेश सरकारशी करार केला आहे. याशिवाय ‘इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून ५० हजार ईव्हीएम खरेदी केली आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाकडेही ‘ईव्हीएम’ची मागणी करण्यात आल्याचे समजते.

मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मोजणी

तिन्ही टप्प्यांत पार पडणाऱ्या या निवडणुकांतील मतांची मोजणी एकत्रित होणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशी होईल. निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि मर्यादित मनुष्यबळ लक्षात घेता प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर मतमोजणी होईल, असेही खात्रीलायकरित्या समजते.

अधिक वाचा  राज्यात केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी? एवढ्या अटी शर्ती लादल्याने कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण

निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था

महापालिका —२९              नगरपंचायती —२४६

जिल्हा परिषद —४२            पंचायत समिती —३२

एकूण —३३६