भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पुन्हा एकदा मैदानावर जबरदस्त कामगिरी करत आपल्या टीकाकारांना गप्प केलं आहे. इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. हे बुमराहच्या कसोटी कारकिर्दीतील 14वे पाच बळीचे यश आहे.
“लोक काय बोलतात, याचा मला फरक पडत नाही”
बुमराहला पूर्वी झालेल्या दुखापतीमुळे काही महत्त्वाच्या मालिकांमधून बाहेर राहावं लागलं होतं. याच गोष्टीवरून अनेकांनी त्याच्या करिअरबाबत शंका व्यक्त केली होती. यावर बुमराहने ट्रोल करणाऱ्यांना ठाम उत्तर दिलं आहे.
“लोक म्हणायचे की मी 8 महिन्यांपेक्षा जास्त क्रिकेट खेळू शकणार नाही. आज माझं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, आणि IPL मध्ये 12 ते 13 वर्ष झाली. लोक काहीही बोलू देत, मी माझं काम करत राहीन.”
“माझ्या नावावर हेडलाइन तयार होतात, लोक पाहतात, पण मला त्याचा काही फरक पडत नाही. जोपर्यंत वरचा (देव) साथ देतो, तोपर्यंत मी खेळत राहीन.”
गोलंदाज म्हणून जबाबदारी निभावताना…
टीम इंडियाने इंग्लंडच्या पहिल्या डावात काही झेल सोडले, यावरही बुमराहने परखड पण समजूतदार प्रतिक्रिया दिली. “हो, थोडा त्रास झाला होता, पण तुम्ही बसून रडत बसू शकत नाही. कधी कधी झेल सुटतात, पण कोणीही मुद्दामून चूक करत नाही. माझं काम मी चोख करत आहे, बाकी गोष्टी नियंत्रणात नाहीत.”
सामन्याची स्थिती:
भारताचा पहिला डाव: 465 धावा
इंग्लंडचा पहिला डाव: 471 धावा
भारताचा दुसरा डाव: 2 बाद 90 धावा (96 धावांची आघाडी)
जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, मैदानावर त्याचं अस्तित्व संपलेलं नाही – तर अजूनही तो भारताचा सर्वात विश्वासार्ह आणि धारदार गोलंदाज आहे.