….मते मिळाली पण आपल्यापर्यंत पोहोचली नाहीत राज ठाकरेंची शंका; फडणवीसांचं हे एका वाक्यात उत्तर

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा निकाल कसा लागला याचा खुद्द निवडून आलेल्या सत्ताधारी आमदारांनाही धक्का बसला असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. तसेच आमच्या आमदाराला तर त्याच्या गावातून एकही मत मिळत नाही, हे कसं होऊ शकतं? असा सवाल करतानाच आपल्याला जनतेने मतदान केलं आहे. आपल्याला मते मिळाली नाहीत. फक्त ती आपल्यापर्यंत पोहोचली नाहीत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांचे राज ठाकरे यांच्या शंकेकडे लक्ष वेधण्यात आलं. यावर फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. राज ठाकरेंवर आपण महाराष्ट्रात बोलू असं फडणवीस म्हणाले.

उपोषण सोडलं, आनंद आहे

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्याचं त्यांनी स्वागत केलं. त्यांनी उपोषण सोडलं याचा आनंद आहे. मराठा समाजाच्या संदर्भात महायुतीनेच निर्णय घेतले आहेत. जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तो प्रयत्न करत आहोत. कायद्याच्या चौकटीतील ज्या ज्या मागण्या ते करतील, किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही पूर्ण करू. भारताचे संविधान आणि कायद्याच्या चौकटीतील मागण्या असल्या पाहिजे, त्यावर योग्य प्रतिसाद सरकार देईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

दिल्लीत परिवर्तन होणार

यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभेत परिवर्तन होणार असल्याचं ठामपणे सांगितलं. दिल्लीने मन बनवलं आहे. दिल्लीची जनता भाजपसोबत जाणार आहे. दिल्लीतील परिवर्तन महिला करणार आहेत. केजरीवाल यांचं सरकार उलथवण्याचा निर्णय दिल्लीकरांनी घेतला आहे, असं ते म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी निवडणूक निकालाची दाखले देत चिरफाड केली. हा निकाल कसा लागला यावरही त्यांनी संशय व्यक्त केला. लोकसभेनंतर लगेचच तीन चार महिन्यात निकाल फिरतो कसा? असा सवाल त्यांनी केला. तसेच आपल्याला लोकांनी मतदान केलं आहे. फक्त ते आपल्यापर्यंत आलं नाही, असं सांगत पुढच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता