पालकमंत्रिपदाचे वाटप धनंजय मुंडेंमुळे रखडले का? शिंदे गटातील नेत्याची ‘ही’ माहिती; आम्ही मात्र निवडणुका अश्या लढायचं ठरवलेलंय

0

पालकमंत्री वाटपापर्यंतच्या निर्णयापर्यंत महायुती आलेली आहे. एक- दोन अपवाद आहेत. ते झाले की, पुढील महिन्याच्या सुरुवातीला पालकमंत्रिपदाचा विषय मार्गी लागेल.संतोष देशमुख खूनप्रकरणी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत आहेत, त्यामुळे पालकमंत्रिपदाचं वाटप थांबलेलं आहे, असे मला तरी वाटत नाही. एखाद्या जिल्ह्याचा अपवाद सोडला तर बाकी कुठे काही अडचण नाही. मात्र, पालकमंत्रिपदाच्या वाटपात मुंडेंचं कारण होऊ शकत नाही, असा दावा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केला.

रायगडावर माध्यमाशी बोलताना भरत गोगावले यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यात बीडच्या प्रकरणावरूनही त्यांना विचारण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाटप थांबलेलं नाही, असे स्पष्ट केले. मंत्री भरत गोगावले म्हणाले, चांगल्या गोष्टी होत असताना काहींसा उशीर होत असतो. पालकमंत्रिपदाच्या वाटपापर्यंतच्या निर्णयापर्यंत महायुती आलेली आहे. एक-दोन अपवाद आहेत. ते झाले की, पुढील महिन्याच्या सुरुवातीला पालकमंत्रिपदाचा विषय मार्गी लागेल, असे आम्हाला वाटते.

अधिक वाचा  नवनिर्वाचितांचं नवं आव्हान! वरिष्ठ सल्ले मार्गदर्शन पूर्ण; शहरात प्रचंड विजय पण अत्यंत महत्त्वाचे हे भाग ठरेनात

संतोष देशमुख खून प्रकरणी सीआयडी, न्यायाधीश आणि एसआयटी या तीन माध्यमांतून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची मला संपूर्ण माहिती नसल्यामुळे त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. संतोष देशमुख यांचा ज्या निघृणपणे खून झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना जो न्याय पाहिजे आहे, तो मिळाला पाहिजे, या मताशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे. त्याच धर्तीवर तपास सुरू असून सात जणांना मोका लावण्यात आलेला आहे. या प्रकरणांतील प्याद्यांचा शोध सुरू आहे. संतोष देशमुख कुटुंबीयांना निश्चितपणे न्याय दिला जाईल, असा विश्वासही गोगावले यांनी बोलून दाखवला.

गोगावले म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शिवसेना महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार आहे, त्यावर भरत गोगावले म्हणाले की, प्रत्येकाची इच्छा असते. ज्याच्या जे मनात येईल, ते तो करेल. आम्ही मात्र महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढायचं ठरवलेलं आहे.

अधिक वाचा  भाजपमध्ये राज्यसभेसाठी ‘भाऊगर्दी’, दिल्लीत अंतिम निर्णय! यांच्या नावावर शिक्कामोर्तब? ५ नावे चर्चेत

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करायचा आहे. त्याबाबत सरकार विचाराधीन आहे. पहिले जे १५०० रुपये सुरू आहेत, ते बंद होणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेत आहोत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देत असताना ते योग्य लोकांनाच मिळाले पाहिजेत, याचीही काळजी आम्ही घेत आहोत. निवडणुकीच्या वेळी थोडी घाईगडबड झाली, नको त्याला पैसे मिळाले होते. ते होऊ नयेत, याची काळजी सरकार घेत आहे, असेही भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.