…..अखेर बीड पालकमंत्रीपदी ‘दादा’ च? जळगाव अमरावती ‘रिपोर्ट कार्ड’ प्रभावीच;  संघ अन् भाजपात हालचाली वाढल्या

0

मुंबई :- महायुतीत राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणही टिपेला पोहोचले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी होत आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजते.

मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील दहशतवाद आणि गुन्हेगारीच्या विषयाला तोंड फुटले तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या. संतोष देशमुख हत्त्या प्रकरणाला भाजपचे  आ.सुरेश धस यांनी विधिमंडळ अधिवेशनात अत्यंत आक्रमक पद्धतीने वाचा फोडली. मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित वाल्मिक कराड याच्या विरोधात खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी संतोष देशमुख हत्त्या प्रकरण खंडणी प्रकरणाशी निगडित असल्याचा दावा आ.धस करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच आघाड्यांवर शिस्त आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घ्यावे अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.

अधिक वाचा  समाविष्ट २३ गावांतील ६२६ कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी! नगरविकास विभागाकडून महापालिकेला पत्र प्राप्त प्रकरण काय?

तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यापूर्वी एकनाथ खडसे मंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. त्याच पध्दतीने अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू व राणा दाम्पत्यांतील वाद टोकाला गेला तेंव्हाही भाजपने पाटील यांच्याकडेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले होते. त्याच सुत्रानुसार बीड जिल्ह्यातील आजची परिस्थिती पाहता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्याच्या तयारीत असल्याचे संघ परिवार व भाजपच्या सूत्रांकडून समजते.

अधिक वाचा  बिल न भरल्यास मृतदेह अडवण्यावरचा चाप उठणार? रुग्णांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावर टीका