महाराष्ट्र सरकारचा शपथविधी उद्या, ५ डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाले, मात्र सरकार स्थापन होण्यात विलंब झाल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका होत होती. अखेर सरकार स्थापन करण्यासाठी मुहूर्त ठरला असून नेत्यांमध्ये मंत्रिपदांसाठी चढाओढ सुरू आहे. पुण्यातील अनेक आमदार मुंबईत दाखल झाले असून, मंत्रिपद मिळवण्यासाठी त्यांची लॉबिंग जोरात सुरू आहे.






चंद्रकांत पाटील यांना पुन्हा मंत्रिपद?
पुण्यातील महत्त्वाचे नेते आणि माजी उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. पुणे शहरातील भाजपा कार्यकर्त्यांना चंद्रकांत पाटील यांच्या पुनर्नियुक्तीची अपेक्षा आहे.
माधुरी मिसाळ यांना मंत्रिपदाची संधी?
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माधुरी मिसाळ यांनीही फडणवीसांची भेट घेतली असून त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. पुण्यातील कसब्याचे हेमंत रासने, शिवाजीनगरचे सिद्धार्थ शिरोळे आणि कॅन्टोन्मेंटचे सुनील कांबळे हे तिघेही सध्या मुंबईत असून, त्यांच्या नियुक्तीसाठी पक्षाकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. हे नेते त्यांच्या भागातील मतदारांमध्ये चांगली लोकप्रियता मिळवलेले आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिपदांसाठी लॉबिंगची चढाओढ
शपथविधीच्या आदल्या दिवशी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची गडबड वाढली आहे. मंत्रीपदांसाठी इच्छुक असलेले नेते आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सागर बंगला आणि देवगिरी येथे नेत्यांची सतत ये-जा सुरू आहे. पुण्यातील आमदारांमध्ये या शर्यतीत कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.










