मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, भाजपच्या कोअर कमिटीची 5 तास खलबतं, पडद्यामागे चाललंय काय ?

0

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता संपली असून अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठा फटका बसल्याने त्यांनी विधानसभेतील विजयासाठी कंबर कसली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल रात्री ( शुक्रवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी झाली. या बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रात्री 8 ते मध्यरात्री 1 अशा 5 तास झालेल्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतील रणनीतीबाबत प्राथमिक चर्चा झाली. भाजपकडून एक ब्लू प्रिंट तयार करण्यात येणार असून येत्या काळात अशा अनेक बैठका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रावसाहेब दानवे पाटील, पंकजा मुंडे उपस्थित होते.

विधान परिषदेच्या नावांबद्दल झाली चर्चा

पुढील महिन्यात विधानपरिषद निवडणूक होणार असून भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत या निवडणुकांसदर्भात चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीसाठी कोअर कमिटीकडून 10 नावं निश्चित करुन ती यादी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहे. राज्यातून पाठवलेल्या 10 नावावर दिल्लीत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील फायद्याचं गणित लक्षात घेऊन फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. उमेदवारी देताना त्या उमेदवाराचा प्रभाव किती आहे, त्याच्यामुळे पक्षाला निवडणुकांमध्ये किती फायदा होऊ शकतो अशा 10 जणांची नावे दिल्लीला राज्यातून पाठवली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अधिक वाचा  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? धर्मेंद्र प्रधान यांच्या पुनरागमनाचीही चर्चा; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही एक विश्लेषणात्मक बैठक होती. ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केले पाहिजे यावर चर्चा केली. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकांवरही चर्चा झाली . सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि आणखी काही निकष लावून चर्चा केली. आम्ही यादी केंद्राकडे पाठवू आणि केंद्र त्यावर निर्णय घेईल , असे बावनकुळे यांनी नमूद केले.

अधिक वाचा  हरित पुणे १०८ कोटी लाटले पण १० टक्केच काम; काँग्रेस गटनेते ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडून कारभार चव्हाट्यावर

ओबीसी आरक्षणावर काय झाली चर्चा ?

केंद्रातील बैठक महत्त्वाची होती. त्यावरही मंथन केलं. जिथे कमी पडलो त्या ठिकाणी पुन्हा काम करणार अजून चांगलं काम करणार. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या विषयावर चर्चा झालेली नाही . तो सरकारचा विषय आहे, ही संघटनात्मक बैठक होती असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

मविआने खोटारडेपणा केला

मविआने खोटारडेपणा केला, जनतेला फसवलं. आदिवासी जनतेला फसवलं, महिलांना फसवलं.. अशा अनेक विषयातून महाविकास आघाडीने मत घेतली . आता लोकांना वाटतं आहे की मोदीजी पंतप्रधान झालेले आहे, मोदीजी वचन दिल्यानुसार काम करतील त्यामुळे जनता नक्की या खोटारडेपणातून बाहेर निघेल . केंद्रातील सरकार आताचे काम करणार आहे त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग हा महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. महाविकास आघाडी सरकार आल्यास जनतेचे नुकसान होईल , ते फक्त केंद्राच्या योजना थांबवण्याचे काम करते . प्रचाराला अनेक मुद्दे असणार आहेत मात्र डबल इंजिन सरकार असेल तर जनतेचा फायदा असतो . जसं उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये झालं, मोदीजी महाराष्ट्रासाठी अनेक योजना आणायला तयार होते मात्र उद्धवजी कधीही मंत्रालयात आले नाहीत. कधीही मोदीजींशी चर्चा केली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालं . आम्हाला मोदीजी नको, आम्हाला मोदीजींच्या सरकार चालत नाही या भूमिकेतून ते काम करत होते म्हणून जनतेचे नुकसान झालं. दोन्हीकडे एका विचाराचा सरकार असेल तर जनतेचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  महसूल विभागात मोठी भरती! 2122 कोतवाल भरती; जिल्हाधिकाऱ्यांच्या निवड समितीमार्फत ही भरती होणार