लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी-अंबानी यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे सेल्फ गोल होता. ही भ्रमित व्यक्तीची लक्षणं आहेत. आपण जिंकत नाही, सत्ता निसटत चालली आहे, याची जाणीव झाल्यामुळे पंतप्रधान मोदी हे व्यथित झाले आहेत. भाजपला (BJP) यंदाच्या निवडणुकीत फारतर 250 जागांवर विजय मिळेल, असे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. निवडणुकीत हार-जीत होत असते. पंतप्रधान मोदी यांनी पराभव स्वीकारला पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.






लोकसभा निवडणुकीत भाजपला 250 जागा मिळतील: पृथ्वीराज चव्हाण
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप 220 ते 250 जागा जिंकेल, एनडीएला २७२ हा बहुमताचा आकडाही पार करता येणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 2019 मध्ये बहुतांश राज्यांमध्ये भाजपचा परफॉर्मन्स इतका चांगला होता की, आता त्यांना वर जायला जागाच शिल्लक नाही. गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपला वर जायला आता जागाच नाही, त्यामुळे याठिकाणी झाल्या तर भाजपच्या जागा कमीच होतील. याचा फटका भाजपला बसेल. माझ्या मते देशातील सहा राज्यं महत्त्वाची आहेत, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा, या सहाही राज्यात भाजपच्या जागा कमी होतील. परिणामी भाजपप्रणित एनडीए 272 ही मॅजिक फिगर गाठू शकणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.












