मोदी पंतप्रधान झाले तेव्हा स्वप्नपूर्ती; पण यानंतर त्यांनी अहंकार अन् आकडे दाखवून त्यांनी चाल बदलली: ठाकरे

0

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांचं काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. राजकीय आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक टप्प्यावर असलेले उद्धव ठाकरे पुन्हा कमबॅक करणार का, या प्रश्नाचं उत्तर ४ जूनला मिळेल. महाविकास आघाडीचा चेहरा झालेल्या ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे.

बाळासाहेब गेल्यावर आता शिवसेनेवर हल्ला करता येईल असा त्यांचा समज झाला. २०१९ मध्ये त्यांनी हेच केलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन, असं वचन मी माझ्या वडिलांना दिलं होतं. शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तेचं समसमान वाटप होईल, असं अमित शहांसोबतच्या बैठकीत ठरलं होतं. मुख्यमंत्रिपद सेना आणि भाजपकडे अडीच-अडीच वर्षे पदं असेल, असं ठरलेलं होतं, याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत केला. आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करुन देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. पण त्यांनी माझ्याच लोकांसमोर मला खोटं ठरवलं, असं ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

भाजपनं अनेकदा विश्वासघात केलाय. त्यामुळे पुन्हा त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं. भाजपकडून दिली जाणारी गॅरंटी पोकळ असल्याची टीका त्यांनी केली. आम्ही हिंदुत्त्व आणि देश या मुद्द्यांवर भाजपसोबत होतो. मग ते आमच्याशी असं का वागले, असा सवाल त्यांनी विचारला.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हा आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. पण अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची चाल बदलली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शहांनी ‘तुम्ही सर्व्हे केलाय का?’ असा सवाल केला. मी त्यांना म्हणालो, ‘आम्ही लढणारे आहोत. आम्हाला सर्वेक्षणांची आवश्यकता नाही. सर्व्हेत पराभव होत असल्याचं दिसलं तर तुम्ही निवडणूक लढवणं सोडणार का?’ या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी आधीची आणि आताची भाजप यांच्यातला फरक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. ‘आधी महाजन, मुंडे, गडकरी यांच्याशी शिवसेनेच्या वाटाघाटी घ्यायच्या. त्यावेळी जागावाटपावेळी रस्सीखेच व्हायची. पण नंतर (भाजपचे नेते) अहंकार आणि आकडे दाखवू लागले,’ अशा शब्दांत ठाकरेंनी शहांवर टिकेचे बाण सोडले.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार