रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची घोषणा

0

मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही निवड केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला व त्यांच्याकडे महसूल हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तत्पूर्वी संघटनपर्व पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना कार्यकारी अध्यक्षपद दिले गेले आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार श्री. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्रातील पक्ष संघटना आणखी बळकट करण्यात श्री. रवींद्र चव्हाण यशस्वी होतील या शुभेच्छा..! @RaviDadaChavan pic.twitter.com/VrhEAYf8A1

— Vinod Tawde (@TawdeVinod) January 11, 2025

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अद्यापही या पदावर राहणार की राजीनामा देणार? याबाबत येत्या काही दिवसांत स्पष्टता मिळू शकते. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडेही सध्या मुंबई भाजपचे अध्यक्षपद असून बावनकुळे आणि शेलार यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत पक्षातील जबाबदाऱ्या कायम राहण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने म. ज्योतिबा फुले यांचा १९९ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर भाजपाचे प्रदेश महाअधिवेशन येत्या रविवारी (१२ जानेवारी) शिर्डी येथे होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत.

 भाजपा आमदार यांची प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यामुळे थोडे नाराज झालेल्या चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार, असे आश्वासन वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांच्यापैकी एका नेत्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल, असेही सांगण्यात येत होते.

अधिक वाचा  IMF अहवालाचा भारताला झटका! जागतिक अर्थव्यवस्थेच्या टॉप 5 मधून बाहेर; हे मोठे कारण आहे?