राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार आहे. विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल. 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
येत्या 7 डिसेंबरला तीन दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व कर्मचाऱ्यांना तयारीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्ष निवड होईल.
स्थिर सरकारची पाच वर्ष पाहायला मिळतील- देवेंद्र फडणवीस
बदल्याचं राजकारण करायचं नाही, बदल दाखवेल, असं राजकारण करु, विरोधकांची संख्या कमी आहे, संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन करणार नाही, त्यांनी योग्य विषय मांडले तर त्यांचा सन्मान देऊ, स्थिर सरकारची पाच वर्ष पाहायला मिळतील. जनतेची अपेक्षा देखील तिच आहे. राज्याला स्थिर सरकार मिळावं अशी जनतेची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत, 2100 देखील देणार आहोत, बजेटच्या वेळी त्याचा विचार करु, आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतर ते करता येतं. जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करु, निकषात असतील त्यांना लाभ मिळेल, निकषाच्या बाहेरच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पूनर्विचार करु, मात्र सरसकट पूनर्विचार करणार नाही, असं देवेंद्र फडवणीस म्हणाले.
आता मी डेडीकेड टू कॉमन मॅन- एकनाथ शिंदे
सीएम म्हणजे कॉमन मन म्हणून काम केलं, पदापेक्षा कामाला जास्त महत्त्व दिले. आता मी डीसीएम आहे, आता मी डेडीकेड टू कॉमन मॅन आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली.
कोणी सांगितले मी नाराज होतो, मी आधीच भूमिका जाहीर केली, माझा पाठिंबा होता, मी गावी गेलो तरी नाराज म्हणता, आता सूत्र कुठली आहेत ते शोधले पाहिजे, असा टोला देखील एकनाथ शिंदेंनी लगावला. मी कामाला महत्त्व देतो, विकासाला महत्त्व देतो, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.