पंढरपूर : आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गर्दी आता वाढू लागली आहे. आज जवळपास तीन लाखाहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले असून भाविकांची गर्दी अजूनही वाढतीच आहे. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्शनाची दर्शन रांग गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत गेली आहे.






पंढरपुरात भक्तीचा मळा भरण्यास सुरवात झाली आहे. येत्या १७ जुलैला आषाढी एकादशी असल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. शिवाय आता पायी वारी करत निघालेल्या पालखी दिंड्या देखील दाखल होत असल्याने भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. चंद्रभागा स्नान करून भाविक दर्शनासाठी रांगेत लागत आहेत. तर आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष सुरू झाला आहे.
१० पत्राशेड झाले भाविकांनी फुल्ल
पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची रीघ सुरूच आहे. आजच्या स्थितीला तीन लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले असून येत्या दोन दिवसात भाविकांची संख्या ५ लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने मंदिर समिती व प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी असलेल्या दर्शन रांगेसाठी तयार केलेले दहा पत्राशेड भाविकांच्या गर्दीने आतापासूनच हाउसफुल्ल झाले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीकडून पाणी चहा नाश्ता आधी सोय उपलब्ध करून दिली आहे. २४ तास दर्शनाची व्यवस्था सुरु असल्याने दर्शन घेऊन भाविक लागलीच बाहेर पडत आहेत.











