महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक खळबळ माजवणारे प्रकरणे घडत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यामध्ये वाढ झाली आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन संघर्ष सुरू आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना आलेली ईडी नोटीस देखील चर्चेत आहे.






काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मोठी टीका होत आहे. शिंदे गटाचे नेते देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केलेल वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. तसेच त्यांचे मोठे नेते भाजपच्या गळाला लागणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. उद्योगमंत्री उदय सामंतांनीही आंबेडकरांच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. त्यांचे अनेक नेते भाजपच्या गळाला लागणार आहे. यामध्ये जयंत पाटील आहेत. त्यांच्यासारखे अनेक नेते आहेत. तुम्ही भाजपमध्ये या नाहीतर तुम्हाला अटक करु, असा अल्टिमेट त्यांना दिला तर पाटील भाजपमध्ये जायला कधीही उत्सुक असतील. जेलमध्ये जाण्यास उत्सुक नसतील. सध्या ईडीच्या कारवाईत राजकीय दबाव कुणावर असेल तर तो राष्ट्रवादी पक्ष आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.










