दोन दिवसापुर्वी अकोला शहरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसान दंगलीत झालं. या दंगलीमुळे उसळेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला तर दहाहून अधिक जण जखमी झाले. या दंगलीत वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेला काही तास उलटत नाहीत तर अहमदनगरमध्येही दोन गटात झालेल्या राड्याचे दंगलीत रुपांतर झाल्याची बातमी समोर आली आहे.






छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (१४ मे) शेवगाव शहरात मिरवणूक निघाली होती.या मिरवणुकीत दोन गटांत वाद झाला या वादानंतर दोन्ही गटात दगडफेक झाली. यात गोंधळात चार पोलीस जखमी झाले तर काही वाहनांचंही नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणूक सुरु असताना दिशेनं एका गटानं दगडफेक केली. तर धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली. त्याचं प्रत्युत्तर म्हणून मिरवणुकीवर दगडफेक केली, असं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे. या गोंधळामुळे स्थानिक व्यावसायिकांनी काही वेळासाठी गोंधळून गेले होते. पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच त्यांनी दुकाने पटापट बंद केली.
दोन्ही गटातील जमावाने वाहनांची तोडफोड केल्याने वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले. दुकानांचीही तोडफोड केली. याचदरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी 102 जणांवर आणि 50 अज्ञात लोकांवरही रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, शेवगाव शहरात राज्य राखीव पोलीस दलाच्याही दोन तुकड्या सध्या तैनात करण्यात आल्या आहेत.पण हा वाद नेमका का आणि कोणी सुरू केला, हे अद्याप समोर आलेलं नाही, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.











