राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी काँग्रेस अडचणीत, ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल… ABVP तक्रारीची गंभीर दखल

0

राहुल गांधींच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात सीओईपी परिसरात झालेल्या कथित गोंधळानंतर शिवाजीनगर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

सीओईपीमधील काही विद्यार्थिनींनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ ‘छात्रो की गूंज’शी संबंधित रील्स तयार केल्या होत्या. तसेच त्यांनी कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर काही उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून आणि अभाविपकडून विद्यार्थिनींवर दबाव आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, यासाठी विद्यार्थिनींना परावृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, सीओईपी हॉस्टेलमधील एका विद्यार्थिनीवर दबाव टाकून तिच्याकडून व्हिडीओ स्टेटमेंट घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी विचारपूस आणि चर्चा करण्यासाठी अभाविपचे काही सहकारी हॉस्टेलमध्ये गेले असता, तेथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, आरोपीला जेवण किंवा जागा देणे म्हणजे गुन्हा नाही युक्तीवाद कामी निर्दोष सुटका

पोलिसांकडून विविध कलमांखाली गुन्हा

या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५ (२), १८९ (१), १८९ (२), १९१ (२), ३५१ (१), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (३) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेसचा अभाविपवर आरोप

या घटनेवर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सीओईपी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप गंभीर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. केवळ राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवल्यामुळे विद्यार्थिनींना धमकावण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले.

पुणे शहर काँग्रेसचे पूर्व विभाग अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. अन्यथा काँग्रेस आपल्या पद्धतीने अशा उपद्रवी लोकांचा बंदोबस्त करून जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. विश्वजीत कदम यांनीही या प्रकरणावर सरकारवर निशाणा साधला. उद्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यामुळे अशा पद्धतीने भाजपकडून वर्तन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

अधिक वाचा  पुण्यात महायुतीत वादाची ठिणगी; स निधी काढण्याचं पाप आयुक्तांनी ठराव निरस्त करण्यासाठी राज्याकडे सुमोटो पाठवा

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रियाकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही ट्विट करत या घटनेवर प्रतिक्रिया दिली. सीओईपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवण्याचा प्रकार गंभीर आणि संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले. केवळ राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवल्यामुळे मुलींना धमकावण्याचा किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार अभाविपला कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विचारांचा सामना विचारांनी करण्याऐवजी मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारणे ही भाजपच्या विद्यार्थी राजकारणाची संस्कृती असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यात विद्यार्थिनींनी कोणते विचार करायचे किंवा कोणाचे स्टेटस ठेवायचे, हे ठरवण्याची ठेकेदारी अभाविपने घेतली आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणातील कथित गुंडगिरीला सरकारचे संरक्षण आहे का, असा सवाल करत विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि मुलींच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर काँग्रेस झुकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा! पुणे रिंगरोड पूर्व विस्ताराला मंजुरी; ३१.८ किमी मार्गावर ४ बोगदे, १८ उड्डाणपूल

राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (शनिवार, ता. २२) पुण्यात दाखल होत आहेत. ‘छात्रों की गूँज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते पुण्यातील ‘सावित्रीं’च्या लेकींशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, जंतरमंतरवरील आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी त्यांनी दिल्लीत आंदोलन केले. त्या पार्श्‍वभूमीवर आज पुण्यातील कार्यक्रमात ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिक्षण आणि बेरोजगारी या विषयांवर देशभरातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधत आहेत. शनिवारी दुपारी ते पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातील हा पहिलाच कार्यक्रम पुण्यात होत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास आरटीओजवळील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.