दिल्लीत जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर देशभरात निर्माण झालेल्या सरकारविरोधी वातावरणाची संधी साधण्यासाठी काँग्रेसने ‘छत्रों की गुंज’ ही मोहीम राबविण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आता विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या मोहिमेसाठी काँग्रेसने पुण्याची निवड केली आहे. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे पुण्यापर्यंत आहेत. तसेच अटक करण्यात आलेले काही आरोपी हे भाजपच्या विचारसरणीच्या शैक्षणिक संस्थांशी निगडीत असल्याने भाजपला लक्ष्य करण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आल्याची भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली आहे.







जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे २२ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. काँग्रेसने या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गेल्या शुक्रवारी पुण्यातील नेत्यांशी काँग्रेस भवन येथे बैठक घेऊन ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाविषयी चर्चा केली. त्यानंतर रविवारी त्यांनी या दौऱ्याच्या नियोजनासाठी कोथरुड विधानसभा मतदार संघात आढावा बैठक घेतली. या बैठकीला ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बैजुजी, मनोज त्यागी, महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, पश्चिम विभागाच्या अध्यक्ष दीप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष लहू निवंगुणे, काँग्रेसचे पुणे महापालिकेचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदू कदम आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
पुण्याची निवड करण्यामागील प्रमुख कारणे
काँग्रेसने ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमासाठी पुणे शहराची निवड करण्यामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचा केंद्रबिंदू हा पुणे आहे. या प्रकरणात पुण्यातून काहींना अटक करण्यात आली आहे. ते भाजपच्या विचारसरणीच्या शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहेत. तसेच पुण्यात देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी आहेत. राहुल गांधी हे ‘छात्रों की गुंज’च्या माध्यमातून या विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकणार आहेत.
गटबाजीचे प्रदर्शन रोखण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ पुण्यात
‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, यासाठी काँग्रेसने विधानसभानिहाय आढावा बैठका घेण्याचे नियोजन केले आहे. कोथरुड विधानसभा मतदार संघानंतर सोमवारी (१७ ऑगस्ट) शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाची बैठक घेतली जाणार आहे. पुण्यात काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. ही गटबाजी वेळोवेळी उफाळून आली आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात गटबाजीचे प्रदर्शन होऊ नये, यासाठी काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पुण्यात ठाण बांधून आहेत. ते स्वत: नियोजनाकडे लक्ष देत असल्याने काँग्रेसच्या दोन्ही गटांचे नेते हे आढावा बैठकांना हजेरी लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.













