पुण्यामध्ये गेल्या ८ दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल झाले. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर, शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाला. गेल्या ८ दिवस सतत पडणाच्या पावसामुळे पुण्यातील धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरलं. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. वर्षभर पुरेल इतका पाणीसाठी धरणात जमा झाला आहे.







पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांमध्ये ५६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या ८ दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. खडकवासला पाठोपाठ पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाल्यामुळे मात्र मागील वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये १३ टक्के कमी पाणीसाठा आहे. पण तरी देखील ८ दिवसांच्या पावसामुळे पुणेकरांचे पाणी टेन्शन मिटलं आहे.
कुठल्या धरणात किती पाणीसाठा?
खडकवासला: ९७.६० टक्के
पानशेत: ५९.६० टक्के
वरसगाव: ५३.४०
टेमघर: ३७.४६
दरम्यान, पुण्यात पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अंधारबन ट्रेक पर्यटकांसाठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. सततच्या अतिमुसळधार पावसामुळे अंधारबन ट्रेक बंद ठेवण्याचा वन विभागाचा निर्णय आहे. अंधारबन भाग दरडी कोसळून दगड मातीने तसेच पाण्याच्या जोराच्या प्रवाहाने मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा ट्रेक मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. सध्या या परिसरात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच कोणताही पर्यटक अडकून पडलेला नसल्याची माहिती आहे. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी अंधारबन ट्रेक मार्ग पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.












