पाऊस 8 जुलैपासून कमी होणार; ‘कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता…’ मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

0

राज्यात सध्या सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावली असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट होईल अशी माहिती देण्यात आली आहे. 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते असंही त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवर पोस्ट करत सांगितलं आहे की, “जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे व नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे”.

अधिक वाचा  महसूल विभागात मोठी भरती! 2122 कोतवाल भरती; जिल्हाधिकाऱ्यांच्या निवड समितीमार्फत ही भरती होणार

“8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते,” असंही त्यांनी सांगितलं आहे.  

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे असं ते म्हणाले आहेत.

अधिक वाचा  मतदारांसाठी धोक्याची घंटा! केवळ एकच दिवस उरला पुण्यातील २८ लाख मतदारांची नावे वगळली जाणार? आजच तपासा यादी