पुणे (प्रतिनिधी): पुणे शहरात सर्वत्र पावसाचे रिपरिप सुरू झाली असून या पावसाळ्यात महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शास्त्रीनगर स्मशानभूमीतील अत्यंत गंभीर परिस्थिती समोर आली आहे. परिसरातून अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना स्मशानभूमीच्या सभागृहातही पावसापासून संरक्षण मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. छताला अनेक ठिकाणी पडलेल्या छिद्रांमधून पावसाचे पाणी थेट आत गळत असल्याने नागरिकांना छत्री घेऊन आप्तेष्टांना निरोप देण्यासाठी उभे राहण्याची वेळ आली.






पुरेपूर बहुमत दिल्यामुळे स्थानिक नागरिकांना यातना सहन करण्याशिवाय पर्याय नाही की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने वारंवार तक्रारी केल्यानंतरही कोणतेही उपायोजना करण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा स्वर आहे. दुःखद प्रसंगी आपल्या आप्तस्वकीयांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांना अशा गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. पुणे महापालिकेच्या कृपाशीर्वादाने स्मशानभूमीसारख्या अत्यावश्यक सार्वजनिक ठिकाणी छताची दुरवस्था, अपुरी देखभाल आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने छताची दुरुस्ती, पावसापासून संरक्षणाची व्यवस्था आणि स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. “मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देतानाही आप्तस्वकीयांना नागरिकांना पावसात भिजावे लागणे ही कोणत्याही प्रशासनासाठी लाजिरवाणीच बाब आहे. संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात,” अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.












