‘शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तंत्रज्ञान, तज्ज्ञ सल्ला आणि नागरिकांचा सहभाग अशी त्रिसूत्री स्वीकारली आहे. शहरात लवकरच ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर (एआय) आधारित ५०० कॅमेरे बसविण्यात येणार असून, मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे,’ अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी शनिवारी दिली. पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांच्या वतीने शनिवारी ‘पुणे ट्रॅफिक परिषदेचे’ आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाटील यांनी शहरातील कोंडी आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली. शहर वाहतूक उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सह-व्यवस्थापकीय संचालक ॲलिस पोरे, दीप्ती चवधरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, पुणे मेट्रोचे अधिकारी मिहीर कुलकर्णी, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत, पत्रकार मंगेश कोळपकर, काँग्रेसचे नेते गोपाळ तिवारी उपस्थित होते.






‘पुण्याची वाहतूक कोंडी ही आता केवळ रस्त्यांची समस्या उरलेली नाही, तर ती नागरिकांच्या आरोग्याशी आणि मानसिक तणावाशी जोडली गेली आहे. ‘एआय’ कॅमेरे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट आणि स्वयंचलित दंडात्मक कारवाई करतील. वाहतुकीचे स्वयंचलित नियमन करण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’चा (आयटीएमएस) प्रकल्प वाहतूक शाखेने तयार केला आहे. ‘आयटीएमएस’चा अहवाल मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला आहे. आगामी काळात उभे राहणारे १०० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे आणि पोलिसांची आधुनिक यंत्रणा यामुळे वाहतुकीचा प्रश्न नक्कीच सुटेल,’ असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
‘पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. मेट्रो स्थानकाजवळ दुचाकीसाठी वाहनतळ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेशी चर्चा करणार आहोत. शहरात पुन्हा लवकरच ‘बस डे’ साजरा करण्यात येणार आहे,’ असे मिहीर कुलकर्णी यांनी सांगितले. अर्चना शहा यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश बागवे यांनी आभार मानले.













