राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा ओलांडला असून देशासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तीव्र झळांनी अक्षरशः होरपळून निघत आहे. विदर्भातील परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आजपासून पुढील तीन दिवस विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या तिन्ही जिल्ह्यांमध्ये तापमान सातत्याने 46 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे.






तापमान वाढीचे समुद्राच्या वाढत्या तापमानाशी कनेक्शन
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉ. सुभाष टाले यांनी विदर्भातील या अभूतपूर्व तापमान वाढीचे थेट कनेक्शन समुद्राच्या वाढत्या तापमानाशी जोडले आहे. “समुद्राचे तापमान सातत्याने वाढत असल्याने हवामानात मोठे बदल होत आहेत. यावर जर तातडीने आणि ठोस उपाययोजना शोधल्या नाहीत, तर आगामी काळात मोठ्या आणि भीषण दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
तापमान वाढण्याची मुख्य कारणे
- भौगोलिक स्थान: अकोला आणि आसपासचा परिसर देशाच्या अंतर्गत भागात असल्यामुळे येथे समुद्राचा थंडावा पोहोचत नाही. परिणामी, उन्हाळ्यात जमीन लवकर आणि वेगाने तापते.
- हवामान बदल : जागतिक तापमानवाढीचा थेट परिणाम स्थानिक पातळीवर दिसून येत असून, उन्हाळा अधिक लांब, कोरडा आणि घातक बनत चालला आहे.
- झाडांची घटती संख्या: वाढते शहरीकरण, रस्ते रुंदीकरण आणि अनिर्बंध बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. झाडे कमी झाल्याने नैसर्गिक सावली आणि थंडावा नष्ट झाला आहे.
- सिमेंटचेचे वाढते जंगल : सिमेंटचे रस्ते, उंच इमारती, टिनशेडची घरे आणि डांबरी रस्ते दिवसभर उष्णता शोषून घेतात आणि रात्रीही ती वातावरणात सोडतात. या प्रक्रियेला विज्ञान जगतात ‘Urban Heat Island’ प्रभाव म्हटले जाते.
- पावसाचे अनियमित प्रमाण: पावसाचे प्रमाण घटल्याने किंवा पाऊस उशिरा आल्यामुळे जमिनीतील ओलावा संपला आहे. कोरडी जमीन सूर्याच्या किरणांमुळे अधिक तापते.
- वाहने आणि औद्योगिक प्रदूषण: कारखान्यांमधून आणि वाहनांमधून निघणारा धूर, कार्बन आणि उष्णता यामुळे स्थानिक वातावरण प्रचंड गरम होत आहे.
- शेती पद्धतीतील बदल: पूर्वी शेतात बारमाही हिरवाई दिसायची. मात्र, आता पाण्याचे दुर्भिक्ष आणि पडीत जमिनींमुळे हिरवळ कमी झाली असून जमिनी कोरड्या पडल्या आहेत.
भीषण संकटावर उपाय काय?
- – मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण
- – पाणीसाठे व तलाव जपणे
- – छतांवर ग्रीन कव्हर / पांढरे रंग
- – कमी प्रदूषण करणारी वाहतूक
- – शहर नियोजनात हरित पट्टे वाढवणे













