राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबई-पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, बीड, जालना, लातूर, अहिल्यानगर, नागपूर जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय. नद्या इशारा पातळीवर पोहोचल्या आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. दरम्यान, मंगळवारीही राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. वादळी वारे, वीजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय.






रायगड, पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट तर राज्यात उर्वरित ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. मान्सून बुधवारपर्यंत राजस्थानसह, गुजरात आणि पंजाबच्या काही भागातून परतण्याचे संकेत आहेत. तर पूर्व विदर्भासह आजूबाजूच्या भागात चक्राकार वारे वाहत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
रायगड, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, सातारा घाटमाथा, बीड, बुलडाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
राज्यात परतीच्या मान्सूनची भयाण परिस्थिती: –
जालना : घनसावंगी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस
बीड: राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून बचावकार्य सुरू
लातूर: तेरणा व मांजरा नदीकाठच्या गावांना इशारा
पुणे : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अतिवृष्टी
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार
रत्नागिरी, सिंधुदुर्ग: मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ
सांगली: मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यात पावसाचा जोर
नागपूर आणखी दोन दिवस तडाखा बसण्याचा इशारा











