नकली सेना ते ठाकरेंच्या मदतीस मी धावणार; मोदींचा सूर बदलला की मोठा प्लॅन ही आहेत महत्त्वाची मोठी कारणं?

0

विदर्भात प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरेंच्या सेनेचा उल्लेख नकली सेना असा केला. आमच्यासोबत असलेली शिवसेना असली, काँग्रेससोबत असलेली शिवसेना नकली अशी टीका मोदींनी केली. त्यानंतर आता मोदींचं आणखी एक विधान चर्चेत आहे. ठाकरे कुटुंबासोबत असलेले संबंध, बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा आदर यावर मोदींनी एका मुलाखतीत भाष्य केलं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी बाळासाहेब ठाकरेंसोबत असलेल्या आपल्या घनिष्ठ संबंधांचा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंची प्रकृती बरी नसताना मी वहिनींशी सातत्यानं बोलत होतो. उद्धवजींच्या प्रकृतीची विचारपूस करत होतो. ते माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर संकट आलं तर त्यांच्या मदतीला धावणारा पहिला माणूस मी असेन, असं मोदी म्हणाले. नकली सेना ते मी धावणार ठाकरेंच्या मदतीला, असा मोदींचा बदलेला सूर भुवया उंचावणारा ठरला आहे. त्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत.

मुंबईकडे सरकणारी निवडणूक अन् ठाकरेंची सहानुभूती

पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जागांवर मतदान झालं. या पाचपैकी एकही जागा ठाकरेंकडे नव्हती. तर दुसऱ्या टप्प्यातील आठ जागांपैकी बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, परभणी या चार जागा ठाकरे लढवत आहेत. निवडणूक हळूहळू मुंबईच्या दिशेनं सरकतेय. पक्षफुटीमुळे ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती कमी करण्यासाठी मोदींनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेल्या आदराचा उल्लेख केला. शिवसेना फुटल्यानंतर शिंदेंसोबत न गेलेल्या, बाळासाहेबांना मानणाऱ्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोदींनी बाळासाहेबांचा उल्लेख मुलाखतीत केल्याचं बोललं जातंय.

अधिक वाचा  आखाती युद्ध कांदा-केळी-द्राक्षांचे 1 हजार कंटेनर अडकले, काही कंटेनर मुंबई बंदराकडे पुन्हा वळवले!

ठाकरेंबद्दल संशय निर्माण करण्याची रणनीती

उद्धव ठाकरे संकटात आल्यास त्यांच्या मदतीसाठी धावणारी पहिली व्यक्ती मी असेन असं मोदी म्हणाले. ते माझे शत्रू नसल्याचा उल्लेखही मोदींनी केला. २०१९ मध्ये भाजपची साथ सोडलेले ठाकरे पुन्हा आपल्यासोबत येऊ शकतात, ते आमचे शत्रू नाहीत, असं म्हणत मोदींनी ठाकरेंच्या मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्यानं, संविधान बदलास विरोध असल्याचं वारंवार सांगत असल्यानं ठाकरेंना अल्पसंख्याक, दलित मतदारांचा प्रतिसाद मिळतोय. आता मोदींच्या विधानामुळे या मतदारांच्या मनात संशय निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक वाचा  केंद्र सरकारची GDP आकडेवारी एवढी घसरण; नवीन आधार वर्ष २०११-१२ वरून २०२२-२३ अशी सुधारणा

संशयकल्लोळ अन् मतदारांच्या मनात घोळ

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर, असा संशय भाजप विरोधी मतदारांच्या मनात मोदींच्या विधानामुळे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना पुढच्या सभांमध्ये मोदींची विधानं खोडून काढावी लागतील. मोदींनी निर्माण केलेल्या संशयाच्या पीचवर ठाकरेंना बॅटिंग करावी लागली. भाजपला ४०० जागा संविधान बदलण्यासाठी हव्या आहेत, असा प्रचार विरोधकांनी केला. त्यामुळे मोदींसह भाजपच्या सगळ्या नेत्यांना स्पष्टीकरणं द्यावी लागली. संविधान बदलायचा कोणताही विचार नसल्याचं सगळ्याच सभांमध्ये सांगावं लागलं. मोदींच्या विधानामुळे आता असंच स्पष्टीकरण देण्याची वेळ ठाकरेंवर येऊ शकते.

चर्चेचं दार खुलं, पुन्हा पॅचअपची शक्यता

बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना मोदी काहीसे भावुक झाले. ठाकरे कुटुंबासोबत असलेल्या आपल्या संबंधांबद्दल ते बरंच बोलले. या विधानांमधून मोदींनी चर्चेची दारं खुली असल्याचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे. पहिल्या दोन टप्प्यात झालेलं कमी मतदान पाहता ही निवडणूक भाजपसाठी सोपी नाही. ठाकरेंनी दोन आकडी जिंकल्यास ते कमबॅक करतील. त्यामुळे शिंदेसेनेला गळती लागू शकते. लोकसभा निवडणुकीत जादुई आकडा गाठण्यात अपयश आल्यास ठाकरेंची मदत भाजपला लागू शकते. त्या अनुषंगानं मोदींनी पेरणी करुन ठेवल्याचं बोललं जात आहे.

अधिक वाचा  ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी

मुख्यमंत्री शिंदेंना गॅसवर ठेवण्याची खेळी

शिवसेनेत अभूतपूर्व बंड घडवून भाजपसोबत हातमिळवणी करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिंदेंना १० पेक्षा अधिक जागा मिळणार नसल्याची चर्चा होती. पण प्रत्यक्षात शिंदेंनी वाटाघाटीत चांगलं यश मिळवलं. सोबत १३ खासदार असताना त्यांनी १५ जागा पदरात पाडून घेतल्या. शिंदेंवर दबाव आणण्यासाठी आणि दाबण्यासाठी मोदींनी ठाकरेंबद्दल विधान केल्याची चर्चा आहे. आम्ही आजही ठाकरेंसोबत बोलू शकतो. तितके आमचे संबंध आजही आहेत, असा संदेश मोदींनी शिंदेगटाला मुलाखतीतून दिला आहे.