महायुतीत जागावाटपाची रस्सीखेच सुरुच; ‘या’ जागांसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही, भाजपसमोर लेखाजोखा मांडला

0

लोकसभेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरूच असून दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक या लोकसभेच्या चार मतदारसंघांबाबतचा शिवसेना आणि भाजप यांच्यातील तिढा अद्याप सुटलेला नाही. यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चार मतदारसंघांमध्ये निवडून येण्यासाठी आवश्यक असलेले समीकरण आणि उमेदवार असे दोन्ही आपल्याकडे असल्याचा युक्तिवादच कागदोपत्री भाजपसमोर मांडल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. मात्र, शिवसेनेने आपल्या इच्छुक उमेदवारांची नावेच भाजपकडे पाठवल्याचे समजते. या चारही जागा जिंकण्यासाठी लागणारे समीकरण आणि योग्य उमेदवार शिवसेनेकडे आहेत, असा युक्तिवादही यासोबत करण्यात आल्याचे समजते. या जागा शिवसेनेलाच मिळाव्यात असा आग्रह शिंदे गटाकडून भाजपकडे करण्यात आल्याचे समजते. ज्या चार जागांसाठी शिंदे यांनी आग्रह धरला आहे त्या चारही जागी शिवसेनेचे खासदार आहेत. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे, शिर्डीत सदाशिव लोखंडे आणि नाशिक लोकसभेत हेमंत गोडसे खासदार आहेत. यापैकी अरविंद सावंत आणि राजन विचारे हे सध्या ठाकरे गटात आहेत, तर उर्वरीत दोघे शिंदे गटाचे खासदार आहेत.

अधिक वाचा  काँग्रेसचा अजातशत्रू नेता सलग 8 टर्म आमदार, राज्यसभेवर? नेमस्त, मुत्सद्दी, अजातशत्रू नेते अशी ओळख हालचालींना वेग, शरद पवारांचं काय?

मुंबईसह ठाणे, नाशिक आणि शिर्डीची जागा लढवण्याबाबत एकनाथ शिंदे ठाम आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा, यासाठी पक्षाचे स्थानिक नेते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र, एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यात राहतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ठाणे लोकसभेची जागा प्रतिष्ठेची आहे. परिणामी ते ही जागा सोडण्यास तयार नाहीत. तर, नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांनी परस्पर हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केल्याने भाजपचे शांतीगिरी महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी या ठिकाणी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी या चार जागा आपण कशा जिंकून आणू याचा लेखाजोखाच भाजपसमोर मांडल्याचे समजते.

अधिक वाचा  अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मोठा कायदा होणार?गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही सरकारकडून हालचालीही सुरू