दोन वेळा महाराष्ट्रात चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या महायुतीसाठी यावेळी लोकसभेचा पेपर अवघड जाणार, अशी स्थिती दिसत आहे. गेल्या काही काळात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीही असाच कौल देताना दिसत आहे. यातच आता सकाळ समूहाच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आले. ज्यात महाविकास आघाडी महायुतीपेक्षा वरचढ ठरताना दिसत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महायुतीमध्ये सामील झाल्यास महायुतीसमोर कडवं आव्हान उभ राहताना दिसत आहे. ते कसं हेच समजून घेऊयात.






सकाळ माध्यम समूहाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एक प्रश्न विचारण्यात आला. आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोणत्या पक्षाला मतदान करणार? यातून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष भाजप ठरताना दिसत आहे. सर्वाधिक मते भाजपला मिळू शकतात, असे या ओपिनियन पोलमधून दिसत आहे.
कोणत्या पक्षाला किती मते मिळू शकतात, याबद्दल सर्वेतील आकडेवारी काय हे बघा…
– भाजप ३३.६ टक्के- काँग्रेस १८.५ टक्के- राष्ट्रवादी काँग्रेस ३.९ टक्के- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार १२.६ टक्के- शिवसेना ४.९ टक्के- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे १२.५ टक्के- महाराष्ट्र नवनिर्माण सेना १.४ टक्के-शेतकरी कामगार पक्ष ०.३ टक्के- वंचित बहुजन आघाडी ३.६ टक्के- एआयएमआयएम ०.६ टक्के- स्वाभिमानी शेतकरी पक्ष ०.४ टक्के- प्रहार ०.३ टक्के- बहुजन विकास आघाडी ०.६ टक्के- भारत राष्ट्र समिती (केसीआर) ०.२- आम आदमी पक्ष ०.५ टक्के- अपक्ष १.१ टक्के- इतर ५ टक्के
महाविकास आघाडीचं पारड जड
या सर्वेक्षणातील मतांची आकडेवारी बघितली तर त्यात महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे. कारण महाविकास आघाडीत जे तीन पक्ष आहे, त्यांना मिळू शकणाऱ्या मतांची टक्केवारी ही महायुतीच्या एकूण टक्केवारीपेक्षा जास्त आहे.
वंचित आघाडीमुळे अनेक ठिकाणी फिरू शकतो निकाल
2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी एमआयएमसोबत लढली होती. त्यामुळे वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही, पण मित्रपक्षाचा म्हणजे एमआयएमचा एक खासदार निवडून आला. पण, वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांमुळे आघाडीचे नऊ ते दहा जागांवरील उमेदवार पडले.
यावेळी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. वंचित मविआ सोबत आली, तर वंचितची ३.६ टक्के मते महाविकास आघाडीला मिळतील. त्यामुळे अनेक मतदारसंघातील निकाल बदलू शकतात. त्यामुळे महायुतीसाठी लोकसभा निवडणूक सोप्पी नसेल.











