अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर झाला. त्यामुळे राज्यात अद्यापही मान्सून सक्रीय झालेला नाही. अशातच मान्सूनचा पाऊस नेमका कधी पडणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शेतकरी, नागरिक उकाड्याने हैराण झालेले आहेत. मात्र, आता पुढील ५ दिवसांमध्ये राज्यातील हवामान बदलणार असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.






दुसरीकडे विदर्भात येत्या दोन दिवसांत उन्हाचा तडाखा जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तसेच विदर्भात २० जून म्हणजेच आज आणि उद्या हवामान कोरडं असेल आणि उष्णतेचा तडाखा बसेल.
दरम्यान, दोन दिवसांनंतर मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस हजेरी लावेल, असं के एस होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा व विदर्भात २२ ते २३ जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे २५ जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाला शक्यता आहे.
मुंबईत येत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होणार असा अंदाज आहे. पुढील ७२ तासांमध्ये मान्सून मुंबई, पुणे शहरात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे रत्नागिरीमध्ये थांबलेला मान्सूनचा प्रवास आता पुढे ७२ तासांमध्ये होणार आहे. येत्या ७२ तासांत मान्सून मुंबई, पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सून केव्हा सक्रीय होणार?
शुक्रवारपासून मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. राज्यात २१ ते २३ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यंदा कोकणात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही थांबल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. परंतु आता मान्सून मुंबईनंतर दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांचाही आशा पल्लवित होणार आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस?
खरंतर, पावसाच्या उशिरा दाखल होण्यामुळे पेरण्या खोंळबल्या आहेत. पण आता जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल. इतकंच नाहीतर नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून (IMD Alert) वर्तवण्यात आली आहे.
छत्र्या घेऊनच घराबाहेर पडा! विदर्भात कडाक्याचं ऊन
याशिवाय विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मात्र आज तीव्र उष्णतेच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागतील. या ठिकाणी आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना हवामान खात्याचा अंदाज जाणून घेतच घराबाहेर पडा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.











