महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर राज्यपालांकडून 12 जणांची नियुक्ती केली जाते. राज्यपालांकडून वाड:मय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असणाऱ्या व्यक्तींना संधी दिली जाते. राज्यपाल रमेश बैस यांनी 7 नावांना मंजुरी दिल्यानंतर विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड,हेमंत पाटील,मनीषा कायंदे, पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार यांनी सामाजिक समीकरण साधत पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी दिली मात्र, या निर्णयानंतर त्यांच्या पक्षात प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे. अजित पवारांच्या पुण्यातील राष्ट्रवादीचे पुणे शहराचे अध्यक्ष श्री. दीपकभाऊ मानकर यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत विद्यार्थी शहर अध्यक्ष शुभम माताळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलंय.






विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी जाहीर करुन त्यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसनं श्री. दीपक मानकर यांना त्यांच्या सामाजिक राजकीय कामाकडे बधुन संधी द्यायला पाहिजे होती, असं माताळे म्हणाले. ज्यांच्या घरात सतत आमदार खासदार मंत्रिपद आहे, अशांनाच पुन्हा पुन्हा संधी देण्यात आली आहे.
कायम धनाड्य साखर सम्राट संस्था मालकांना झुकतं माप दिल गेलंय, असं म्हणाले. कार्यकर्त्यांचा पक्षात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुणे शहर विद्यार्थी कॅाग्रेस महायुतीच्या कोणत्याच उमेदवाराला मतदान करणार नाही याची पक्षाने गंभीर दखल घ्यावी, असं विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे म्हणाले. याशिवाय पक्षाच्या प्रमुखांकडे पुणे शहर विद्यार्थी अध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवणार असल्याचं देखील माताळे यांनी म्हटलं.













