भेसळ आणि खाद्यपदार्थांबाबत इतर कोणतीही तक्रार करण्यासाठी एक डॅशबोर्ड तयार केला आहे. त्यात राज्यातून सर्वाधिक तक्रारी पुण्यातून दाखल झाल्या आहेत,’ अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी दिली. ‘अस्वच्छ अन्नाबाबत सर्वांत जास्त तक्रारी आहेत,’ असेही त्यांनी सांगितले. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) आयोजित अन्न सुरक्षा परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना मुंढे यांनी ही माहिती दिली. ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते.







‘एआयचा वापर करणार’
मुंढे म्हणाले, ‘खाद्यपदार्थांबाबत यापूर्वी एखाद्या आस्थापनेने कोणता गुन्हा केला, त्यावर काही कारवाई झाली होती किंवा कसे, याचा इतिहास समजणार आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून एकात्मिक ऑनलाइन प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावावर असलेल्या विविध आस्थापना आणि त्यांनी खाद्यपदार्थ मानकांचे केलेले उल्लंघन याची माहिती मिळेल.’
‘ब्लॉकचेन’चा वापर
‘एकाच व्यक्तीचे खाद्यपदार्थ किंवा औषध क्षेत्रातील विविध व्यवसाय असतील, तर ‘ब्लॉकचेन’च्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा मागोवा घेता येईल. भेसळखोरांवरच नव्हे, तर मानकानुसार खाद्यान्न तयार होते किंवा कसे, यावर आम्ही नियामक म्हणून देखरेख करीत आहोत.
खाद्यपदार्थात वापरलेले अन्न घटक तपासा
‘स्वातंत्र्यावेळी देशामध्ये हृदयविकार, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण केवळ ३० टक्के होते. त्यात आता ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. याला कारणीभूत म्हणजे आपण घेत असलेला आहार. त्यामुळे केवळ उत्पादनाची किंमत आणि उत्पादन वापरण्यायोग्य तारीख (एक्स्पायरी डेट) न तपासता त्यात वापरलेले अन्नघटक कोणते आहेत, हेदेखील पाहायला हवे,’ असे आवाहन मुंढे यांनी केले.
कार्यवाहीची माहिती वरिष्ठांना मिळेल
‘विभागाकडून सुरक्षित अन्न आणि औषधांवर प्राधान्याने लक्ष दिले जात आहेत. खाद्यपदार्थ तयार करण्यापासून त्याची साठवणूक, वाहतूक ते ग्राहकांना सांगितल्यानुसार अन्न-औषधांचे वितरण होते किंवा कसे, अन्नसुरक्षेच्या २२ मानकांचे पालन होते किंवा कसे, हे तपासले जात आहे. मानकांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. तक्रार अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्यांनी वेळेत कार्यवाही न केल्यास वरिष्ठांना त्याची माहिती मिळते,’ असे मुंढे यांनी सांगितले.













