महात्मा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे मनपाकडून वर्षभर कार्यक्रम

चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्तही सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

0
Mahatma Phule Bicentenary

पुणे, ता. २९ : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या पक्षनेते सभेत मंजुरी देण्यात आली.

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी ५ मे २०२६ रोजी यासंदर्भात प्रस्ताव सादर करून ऐतिहासिक वर्षानिमित्त नियोजनबद्ध कार्यक्रमांसाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीला पक्षनेते सभेने मान्यता दिली आहे.

यंदा महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी वर्ष साजरे होत असून, पुणे महापालिकेचे सदस्य म्हणून त्यांच्या कार्याला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच सामाजिक समतेच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण चवदार तळे सत्याग्रहालाही १०० वर्षे पूर्ण होत असल्याने पुण्यात या ऐतिहासिक घटनांचे स्मरण विविध उपक्रमांतून करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  खासदार बजरंग सोनवणेंना मोठा धक्का पोलिसांची ही कारवाई विलास घुले हत्याप्रकरणात मुलाचा पाय खोलात

यापूर्वी स्थायी समितीने या उपक्रमांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली होती. तसेच एप्रिल महिन्यात झालेल्या मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली होती.

मंजूर प्रस्तावानुसार महापालिकेचे सर्व पदाधिकारी, गटनेते आणि नगरसेवकांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येणार आहे. समिती वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी करणार असून, समितीवरील दोन सदस्यांची नियुक्ती पक्षनेते सभेमार्फत केली जाणार आहे. कार्यक्रमांच्या नियोजन आणि अंमलबजावणीचे अधिकार महापौरांना देण्यात आले आहेत.

या उपक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांतील वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा, विचारप्रबोधनपर व्याख्याने, मिरवणुका, प्रदर्शने, सामाजिक जनजागृती अभियान तसेच महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करणारे विविध कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत.

अधिक वाचा  पावसाच्या जोरदार सरींने बळीराजा सुखावला हे धरण भरले; मुळाही प्रवाहीत झाली भात रोपांना संजीवनी

या निर्णयामुळे महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या वारशाचा नव्या पिढीपर्यंत अधिक व्यापक प्रसार होईल, असा विश्वास उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केला.