भाजपविरोधात ‘या’ 5 मुद्द्यांवर 2 वर्षांनंतर 25 विरोधी पक्ष आले एकत्र; इंडिया आघाडीच्या बैठकीत २५ पक्षांचा सहभाग

0

आगामी संसदीय अधिवेशन आणि देशातील विविध राजकीय व आर्थिक घडामोडींवर संयुक्त भूमिका निश्चित करण्यासाठी सोमवारी राजधानी दिल्ली येथे झालेल्या विरोधी इंडिया (INDIA) आघाडीच्या बैठकीत २५ पक्षांनी सहभाग घेतला होता. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याबाबत बैठकीत एकमत झाले. आघाडीची पुढील बैठक ऑगस्ट महिन्यात हैदराबाद येथे घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR), मतदान प्रक्रियेत कथित गैरव्यवहार आणि निवडणुकीतील पारदर्शकतेच्या प्रश्नांबाबत लवकरच भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. तसेच लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करण्यावरही सर्व घटक पक्षांची सहमती झाली आहे.

अधिक वाचा  शिवराज्याभिषेक दिन! एरंडवणे गणेश नगर, लक्ष्मीनगर भागात 51 गणपती मंडळांनी उभारली शिवकश राजदंड स्वराज्य गुढी

सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी –

देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती, वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही इंडिया आघाडीने केली आहे. याशिवाय आघाडीतील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी दर दोन महिन्यांनी बैठक घेण्याचा निर्णय झाला असून संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात नियमित समन्वय बैठका घेण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बैठकीनंतर सांगितले की, पाच प्रमुख मुद्द्यांवर सर्व पक्षांमध्ये एकमत झाले असून हे प्रश्न संयुक्तपणे संसदेत आणि जनतेसमोर मांडले जातील. त्यांनी यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबतही त्यांनी भाजपवर टीका केली.

देशातील बडे नेते बैठकीला उपस्थित –

अधिक वाचा  राज्यातील Sc, St, OBC, Vjntच्या 600 जातींसाठी एक न्याय… आणि एका जातीला स्पेशल ट्रीटमेंट बेकायदेशीर ॲड. ससाणे

दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या या बैठकीत काँग्रेस संसदीय दलाच्या प्रमुख सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली, तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही ऑनलाइन सहभागी झाले.

DMK आणि AAP पक्ष राहिला दूर –

बैठकीला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, भाकपचे डी. राजा, भाकपा (माले)चे दीपांकर भट्टाचार्य यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि आम आदमी पक्ष (AAP) या बैठकीपासून दूर राहिले. ‘आप’ने यापूर्वीच इंडिया आघाडीपासून अंतर ठेवण्याची भूमिका जाहीर केली आहे, तर काँग्रेससोबतच्या मतभेदांमुळे डीएमकेने बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगितले होते.

अधिक वाचा  शिवराज्याभिषेक दिन! एरंडवणे गणेश नगर, लक्ष्मीनगर भागात 51 गणपती मंडळांनी उभारली शिवकश राजदंड स्वराज्य गुढी

तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेस सूत्रांनी स्पष्ट केले की, बैठकीसाठी प्रामुख्याने संसदेत प्रतिनिधित्व असलेल्या पक्षांनाच निमंत्रित करण्यात आले होते. मात्र इंडिया आघाडीचा विस्तार सुरू असून लवकरच आणखी काही पक्ष या आघाडीत सहभागी होतील, असा दावा सूत्रांनी केला. पश्चिम बंगालमधील अलीकडील राजकीय घडामोडी आणि भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेता विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. इंडिया आघाडीची यापूर्वीची अधिकृत बैठक जून २०२४ मध्ये झाली होती.