‘इंडिया आघाडी’ अभेद्यच! काँग्रेसचा दावा; आजच्या बैठकीत 23 पक्षांचे नेते राहणार उपस्थित

0

तीन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ जनबंधनची महत्त्वपूर्ण बैठक आज, सोमवारी राजधानी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे होणार आहे. या बैठकीसाठी २३ घटक पक्षांनी सहभाग निश्चित केला असून, इंडिया आघाडी अभेद्य असल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने द्रमुकचा हात सोडल्याने द्रमुकने लोकसभेत आपल्या आसनव्यवस्थेत बदल करून काँग्रेसशी काडीमोड घेतल्याचे संकेत दिले. तसेच ‘इंडिया’ जनबंधनच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर बैठकीकडे घटक पक्ष पाठ फिरवतील, असे मानले जात होते. मात्र, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर माहिती देताना ‘इंडिया’ आघाडी अभेद्य असल्याचे नमूद केले. काही पक्षांनी विविध कारणांमुळे या बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली असली, तरी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधातील त्यांची भूमिका कायम आहे. त्यांनी केंद्र सरकारवर मताधिकार हिरावून घेणे, संविधानावर हल्ला, तपास यंत्रणांचा गैरवापर, वाढती महागाई आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर रमेश यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून टीका केली.

अधिक वाचा  हवेली तालुक्यात अहिल्यादेवी जयंती उत्सवात दोन गटात हाणामारी, ५ जखमी परस्परविरोधी गुन्हे दाखल

या बैठकीत राष्ट्रीय प्रश्नांवर मोदी सरकारला घेरण्यासाठी संयुक्त रणनीती आखली जाणार असून, विरोधी पक्षांमधील समन्वय वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र, बैठकीपूर्वीच आघाडीत मतभेदही समोर आले आहेत. द्रमुकने काँग्रेसवर तमिळनाडूमध्ये विश्वासघात केल्याचा आरोप करत बैठकीवर बहिष्कार टाकला आहे, तर केरळमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे माकपनेही नाराजी व्यक्त केली आहे. बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विरोधकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर प्रथमच बैठक

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडूमध्ये द्रमुक यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर आणि राज्यांमधील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी या बैठकीकडे अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने संत कबीरांची ६२८ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

जे पक्ष या बैठकीला येऊ शकणार नाही, त्यांनीही देशातील कोट्यवधी जनतेचे हक्क हिरावून घेणाऱ्या, संविधानावर रोज हल्ले करणाऱ्या आणि देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आणणाऱ्या मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आपला तीव्र विरोध कायम ठेवला आहे. भारताप्रमाणेच ‘इंडिया जनबंधन ‘ही विविधतेसह एकसंध आहे.

-जयराम रमेश, काँग्रेस नेते