समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारतीय नौदल हाय अलर्टवर भारताचा इराणला इशारा

0

भारतीय ध्वज असलेल्या एका व्यापारी जहाजावर ओमानच्या किनारपट्टीजवळ भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे आखाती देशांमधील तणाव आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून भारताने या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सुदैवाने, ओमानच्या प्राधिकरणाने तातडीने बचाव मोहीम राबवून सर्व भारतीय क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढले आहे. मात्र, “व्यापारी जहाजांवरील असे हल्ले भारत कदापि सहन करणार नाही,” असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

नेमकं काय घडलं?

२८ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अरबी समुद्रातील परिस्थिती स्फोटक बनली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ओमानच्या तटाजवळ भारतीय जहाजाला लक्ष्य करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “व्यापारी जहाजे आणि निष्पाप खलाशांना वारंवार लक्ष्य केले जाणे हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.”

अधिक वाचा  अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ; पक्षाने आपली जुनी फळी पूर्णपणे बाजूला केल्याचे चित्र

भारतीय नौदल हाय अलर्टवर

जगातील ९५ टक्के व्यापार समुद्री मार्गाने होत असताना अशा हल्ल्यांमुळे केवळ भारताचीच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. या घटनेनंतर भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने या क्षेत्रात आपली गस्त आणि देखरेख वाढवली आहे. सर्व भारतीय जहाजांना विशेष ‘सुरक्षा प्रोटोकॉल’ पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

युद्धाचा भडका आणि भारतीयांचे बळी

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या जहाजांना इशारा दिला आहे. या आधीही या संघर्षात अनेक भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. १ मार्च २०२६ रोजी ‘स्कायलाईट’ तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यात २ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. ‘MKD VYOM’वर झालेल्या ड्रोन हल्ल्यात एका भारतीय खलाशाने जीव गमावला.’Ayeh’ या जहाजावर झालेल्या हल्ल्यात एक भारतीय गंभीर जखमी झाला होता.

अधिक वाचा  देशात घाऊक दर 42 महिन्यांच्या उच्चांकावर; पेट्रोल-गॅसच्या किमतींनी महागाईचा स्पोट! सामान्य नागरिकांवर परिणाम काय?

भारताची आंतरराष्ट्रीय समुदायाला साद

भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे समुद्री व्यापार मार्गांच्या सुरक्षेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “नौकानयनाचे स्वातंत्र्य आणि वाणिज्य बाधित करणे थांबवले पाहिजे,” असे भारताने ठामपणे सांगितले आहे. ओमान सरकारने केलेल्या तत्पर मदतीबद्दल भारताने त्यांचे आभार मानले आहेत.