आमदारांच्या बैठकीत काय ठरलं? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांच्या शिलेदाराकडून आतली बातमी समोर

0
कृषीमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांवर मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे. वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार विक्रम काळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले विक्रम काळे?

मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी धाराशिवमध्ये केलं आहे. अजितदादा दर मंगळवारी सर्व आमदारांची बैठक घेतात, याही मंगळवारी बैठक झाली. मात्र या बैठकीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. परंतु जर कोण मस्साजोग हत्या प्रकरणात दोषी असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय पक्ष घेईल, त्याच बरोबर मस्साजोग या प्रकरणात कोणालाही आमचा पक्ष आणि सरकार पाठीशी घालणार नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आमदार विक्रम काळे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील पहिलं ४० लाखांचे महापालिकेचे टॉयलेट स्वच्छतागृह की आलिशान घर बेडरूम हॉल अन् किचन!

वाल्मिक कराड आयसीयूमध्ये

वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, मात्र त्याची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, वाल्मिक कराड याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना शंका उपस्थित केली आहे. सुटून जायचे किंवा इतर सर्व षडयंत्र झाले असतील तर आता परत जेलमध्ये जावं, डॉक्टर नक्की कोणत्या तपासण्या करत आहेत, काय ऑपरेशन सुरू आहे? सुटून जायचं ऑपरेशन सुरू आहे का? पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांमध्ये नेमकं काय सुरू आहे? असे अनेक प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

अधिक वाचा  समाविष्ट २३ गावांतील ६२६ कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी! नगरविकास विभागाकडून महापालिकेला पत्र प्राप्त प्रकरण काय?