राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यातच मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाकडे आतापासूनच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट, अशी तिरंगी लढत होणार आहे.






अमित ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघच का निवडला?
मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनसेच्या उमेदवारांच्या यादीत नाव आल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. मी लहानपणापासून या भागात वाढलोय, आम्हाला या मतदार संघातले विषय मला माहित आहे. लोकांचे प्रश्न मला तोंडपाठ आहे. त्यामुळे समोर कुणीही आलं तरी मी लढणार, अशी भूमिका अमित ठाकरेंनी जाहीर केली. दरम्यान काही महिन्यांपूर्वी अमित ठाकरे भांडुप विधानसभेतून निवडणूक लढवणार अशी चर्चाही रंगली होती. त्यानंतर काही दिवसांआधीच अमित ठाकरेंनी माहीम विधानसभेतून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभेतूनच निवडणूक लढवावी, असा एक अहवाल सादर करण्यात आला होता. दादर येथील पक्षाच्या राजगड कार्यालयातून अमित ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधत असतात, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तसेच 2019 च्या निवडणुकीत माहीममध्ये मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते देखील मिळाली होती. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी माहीम मतदारसंघच सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
अमित राज ठाकरे यांचा राजकीय परिचय-
अमित राज ठाकरे यांचा जन्म 24 मे 1992 रोजी झाला. अमित ठाकरेंचं पदवीधर, एमबीए (मार्केटिंग) असं शिक्षण आहे. राजकारण, फुटबॉल आणि व्यंगचित्र रेखाटणे ही अमित ठाकरेंची आवाड आहे. 23 जानेवारी 2020 साली अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2022 साली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ठाकरे परिवारात जन्म झाल्याने जन्मापासून अमित ठाकरे यांच्यावर महाराष्ट्र आणि देशपातळीवरील राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार होत होते. अमित ठाकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाला कॉलेज जीवनापासूनच सुरुवात केली. सन 2006 मध्ये राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केल्यानंतर अमित ठाकरे ही राजकारणात जास्त सक्रिय झालेले पाहायला मिळाले. या दरम्यानच्या काळात त्यांनी माननीय राज ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र दौरा केलाच पण यामध्ये ठाकरे परिवाराचा सदस्य असल्याने कोणतीही जास्त अपेक्षा केली नाही.
अनेक प्रश्नांना वाचा तर फोडली-
राज ठाकरेंच्या दौऱ्यात अमित ठाकरे हे नेहमी एका कोपऱ्यात उभे राहून राज ठाकरे, संबंधित पदाधिकारी आणि मनसैनिकांना काय मार्गदर्शन करत आहेत याचा आढावा घेतला. या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात तरुण पिढीला आणि समाजाला कोणते प्रश्न भेडसावत आहेत? इतर राजकीय पक्ष फक्त जनतेचा मतदानापुरता वापर करून महाराष्ट्राच्या नवनिर्माणाबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलत नाही आहेत, हे त्यांना कळून चुकले. यासर्व बाबींचा विचार करता राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश करण्याअगोदर आणि केल्यावर त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा तर फोडलीच पण न्याय सुद्धा मिळवून दिला.












